महाराष्ट्र

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आजपासून ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

 पुणे -गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली होती. आता पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. 
 येत्या दोन ते तीन दिवसांत काही ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उत्तर कोकणात शनिवार ते सोमवार या कालावधीत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 
विशेषतः रविवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर (घाट परिसर), सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल तर कोकणामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button