लोकशाहीर अमर शेख

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख यांचा आज 29 ऑगस्ट स्मृतिदिवस.
शाहीर अमर शेख. हे नाव ना कधी टिपा द्याला विचारलं गेलं, ना रिकाम्या जागा भरा… किंवा जोड्या लावाला. सविस्तर उत्तरं द्या तर सोडूनच द्या. मग आम्हाला कसे माहीत असणार ते… आणि तसंही ही शाहीर बिहिर मंडळी, यांना आता कोण विचारतंय. ते केव्हातरी रिएलिटी शोला दिसतात. किंवा 1 मे, नाहीतर मग शिवजयंतीला. त्यातून शिवजयंती दोनदा सेलिब्रेट होते म्हणून बरं आहे. तेवढीच शाहिरांना दोन दिवस डिमांड. या अशा परिस्थितीत “शाहीर अमर शेख कोण माहीत आहे का?” असं कुणीतरी विचारावं म्हणजे सीनिअर केजीतल्या पोराला अआई येते का असं विचारण्यासारखं नाहीये का?
मुळात शाहीर अमर शेख तुम्हा-आम्हाला का माहीत असावेत? ते माहीत नसले म्हणून काय बिघडलं? आणि त्यांनी एवढं केलंय तरी काय ओ? आणि केलं असलंच तरी आपल्याला कुठे माहितेय? तर या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. या प्रश्नांच्या उत्तरांनी शाहीर मोठे होणार नाहीयेत. ते तर मोठेच आहेत. मोठे होऊ ते आपण. त्यांच्या आणि आपल्या नजरेत. किंवा फाऊंटनच्या सिग्नलवर उभ्या असलेल्या त्या हुतात्म्यांच्या नजरेत. तर…
मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात २० ऑक्टोबर १९१६ ला जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व ⇨ मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी , पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली.
शेख यांची काव्यं वैशिष्ट्यपूर्ण होती. जनसामान्यांचं दुःख ते आपल्या काव्यांतून मांडत असत. उदा. ‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठो आम्ही’. जनसामान्यांचं दुःख, त्यांच्या समस्या, त्यांच्या वेदनांना कोणी वाचा फोडत असेल, तर ते शाहीर अमर शेख. त्यांच्या काव्याची नाळ जनसामान्यांच्या भावनांशी जोडलेली होती. त्यांच्या काव्याचे विषय केवळ कामगार आणि कष्टकरी नव्हते, तर जिथं सामान्य माणूस आहे, त्याच्या दुःखांची जी काही वेदना आहे, ती विविध पद्धतीनं आलेली असते,
मनमिळावू स्वभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची पद्धत, त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक कलावंत त्यांच्याकडं आले आणि लाल बावटा कलापथक उभं राहिलं. विविध जाती- धर्मांचे लोक अमर शेख यांनी आपलेसे केले. बहुजनांविषयी त्यांना आपुलकी होती. या कलापथकात अशोक मिठ्ठा, शेख जैनू, शेख चाँद, विष्णू सोनवणे, शाहीर गव्हाणकर, अण्णा भाऊ साठे हे अमर शेख यांच्यामुळं आले होते. अण्णा भाऊ साठे हे अमर शेख यांना गुरू मानत असत. प्रचंड शिस्त आणि प्रामाणिकपणा अमर शेख यांनी या कलावंतांमध्ये रुजवला. कला प्रथम, मग बाकीच्या भावनिक गोष्टी, असा मंत्र त्यांनी दिला. त्यांनी माणसं कशी घडवली याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शेख जैनू चाँद. या सगळ्या मंडळींचं अमर शेख यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. अमर शेख यांनी दिलेली हाक लाख मोलाची होती. घरात कुठलीही परिस्थिती असली, तरी अमर शेखांच्या हाकेला कलावंत धावून जायचे.
आचार्य अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. आचार्य अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला
मनमिळावू स्वभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची पद्धत, त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक कलावंत त्यांच्याकडं आले आणि लाल बावटा कलापथक उभं राहिलं. विविध जाती- धर्मांचे लोक अमर शेख यांनी आपलेसे केले. बहुजनांविषयी त्यांना आपुलकी होती. या कलापथकात अशोक मिठ्ठा, शेख जैनू, शेख चाँद, विष्णू सोनवणे, शाहीर गव्हाणकर, अण्णा भाऊ साठे हे अमर शेख यांच्यामुळं आले होते. अण्णा भाऊ साठे हे अमर शेख यांना गुरू मानत असत. प्रचंड शिस्त आणि प्रामाणिकपणा अमर शेख यांनी या कलावंतांमध्ये रुजवला. कला प्रथम, मग बाकीच्या भावनिक गोष्टी, असा मंत्र त्यांनी दिला.
अमर शेख यांचा पिंड कलावंताचा असल्या कारणानं ते कलापथकातच अधिक रमले. कलावंत म्हणून जगण्यात त्यांना खूप आनंद वाटला. कलेच्या व्यासपीठावर कलावंतच उभा हवा, इतरांचं तिथं काही काम नाही, अशा शिस्तीचे ते होते. अमर शेख यांनी वैश्विक आणि विज्ञानवादी संदेशसुद्धा आपल्या शाहिरी रचनेतून दिलेला आढळतो, मानवानं चंद्रावर पायसुद्धा ठेवला नव्हता, त्या वेळी अमर शेख लिहितात की,
‘दिवे जादूचे लाख पेटविले
क्षणात टाकीन बदलून जीवन
हे जग जर होईल निकामी
तरीही काढीन युक्ती नवी
एक नवा ग्रह असाच निर्मिला
इथले जीवन तिथे फुलवीन
अशी विज्ञानवादी कवनं एखाद्या चळवळीतल्या शाहिरांना सुचणं म्हणजेच एका प्रतिभावंत कलावंताचा उदय होणं हे होय. आपल्या केसांची ठेवण, गायकीची लकब आणि शरीरासारखीच पहाडी आलापी घेण्याची ताकद अमर शेख यांच्यामध्ये होती.
हे असं सगळं जरी असलं तरी आजघडीला शाहीर अमर शेख उपेक्षित राहिले हेच कटू सत्य आहे. त्यांच्या या उपेक्षेमागे एक कारण प्रामुख्याने दिसतं. ते त्यांचं सेक्युलर असणं. ते जन्मले मुस्लिम म्हणून. पण त्यांनी ना कधी तो धर्म मानला, ना कधी इतर कोणता धर्म. त्यामुळे ते कुणा एका समुदायाचे होऊ शकले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राला आपलंसं केलं. आणि महाराष्ट्राने त्यांना. पण आज ना मराठ्यांना ते स्मरतात ना इतर कुणाला. यापेक्षाकाही एक ग्रेट गोष्ट या माणसाबद्दल समजली. ती म्हणजे, त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर जात लिहिलेय ह्युमॅनिटी. माणूसकी. यावर आपण पुढे काय कमेंट करावी कळतच नाही. हे खरंच निःशब्द करणारं आहे.
२९ ऑगस्ट १९६९ रोजी या महान लोकशाहीराचा अपघाती मृत्यू झाला.
( सदरचा लेख फेसबुक वरून घेतला आहे )



