सामाजिक

देव माणुस केंद्रित आहे, माणूस देव केंद्रित नको.

गेल्याच आठवड्यात ‘धम्मम’ ही शार्टफिल्म पाहिली. त्याचेे दिग्दर्शन पा.रंजिथ यांनी केलंय. पा.रंजिथ हे नव्या दृष्टीकोनाचे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आहेत. वयाची चाळीशीही न ओलांडलेल्या रंजिथ यांची भूमिका घेत वैचारिक संदेश देणारे लेखक म्हणून ख्याती आहे. काला, कबाली आणि मद्रास सारखे बहुचर्चित चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
तथागत बुद्धांच्या खांद्यावर चढून आकाश बघण्याचा प्रयत्न करणारी एक मुलगी …. जवळच शेतात काम करत असलेला तिचा बाप ते पाहून हैराण होतो. तो मुलीला सांगतोय की, तू खाली उतर देवावरून..! ती मुलगी म्हणते की बुद्ध देव आहे काय?? त्यानेच तर म्हटलेय की तो देव नाहीये म्हणून. बुद्धानी सांगितले आहे की इथे कोणी देव नाही, तुम्ही बुद्धांना देव का म्हणता? मुलीच्या या प्रतिप्रश्नाने तो निरूत्तर होतो….केवळ 30 सेकेंदच्या या फिल्मने देव, देवत्व आणि नवीपिढी यांच्याशी असेलेला अनुबंध अधोरेखीत केला आहे.
मंदिर असो वा मशिद वा कोणत्याही प्रार्थना गृहाबाहेरील मनोरे उंचीमध्ये आकाशासी स्पर्धा करत असतांना मोबाईल स्क्रीनच्या माध्यमातून जगच आपल्या मुठीत घेतलेल्या आजच्या पीढीची प्रतिनिधी म्हणून या मुलीचा हा प्रश्न आहे. तो जितका महत्वाचा तितकाच आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. त्या पिढीला आपण परंपरेच्या, धार्मिक कल्पनांच्या आणि मिथकांच्या त्याच त्याच रूपकं, प्रतिकांमध्ये बंदिस्त ठेवायचं की स्वत:च्या विचारांना पंख लावून भरारी घेतांना अडवायच नाही. हे ठरविण्याबाबत अधिक सजगतेने भूमिका घेण्याची गरज दर्शविणारी ही वेळ असल्याचे वाटते. हल्ली आपल्या भावना खूप संवेदनशील झाल्या आहेत. त्यात धर्माचा अथवा श्रध्दास्थांनांचा विषय असेल तर कधी भडका उडेल हे सांगता येत नाही. यापार्श्वभूमिवर पा.रंजिथ यांच्या ‘धम्मम’चे सर्वस्तरातून स्वागत होणे, त्यांच्या विवेकी मांडणीचे कौतुक होणे अभिनंदनीय आहे. नव्या दृष्टीकोनाचे स्वागत करण्याच्या बुध्दांच्याच सिध्दांतांचा वारसा आपण जपतोय याचा खूप आनंद आहे.
तथागत बुध्दांनी देव ही संकल्पना नाकारली आहे. त्यांचा दृष्टीकोन विज्ञानवादी आहे. आपली भूमिका तर्काच्या निकषावर तपासून पाहण्याचा आग्रह बुध्द धरतात. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना असल्याचे तथागत सांगतात. आपण जे सांगतो तेच अंतिम सत्य असल्याचा दावा बुध्द कधीच करत नाहीत. उलट अंतिम सत्याचा शोध प्रत्येकाने आपल्या परीने घ्यावा असा संदेश देतात. आपण निरंतरपणे अंतिम सत्याच्या शोधात असायला हवं याचा आग्रह बुध्द धरतात. ज्ञान अनंत आहे. ज्ञान व्यापक आहे. ज्ञानाला मर्यादा नाहीत. सर्व जग ज्ञानाने भरले आहे. या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी व्हावा. बहुजनांसाठी व्हावा. बहुजन हिताय बहुजन सुखाय हेच ज्ञानाचे प्रथम आणि अंतिम उद्दीष्ट असायला हवे. ज्ञानाची भूक कधीच संपू नये हा मार्ग बुध्द सांगतात. हेच बुध्दांच्या विचारांचे बलस्थान आहे. जो विचार ताठर राहतो, लवचिकता सोडून देतो, तो नष्ट होण्यास वेळ लागत नाही. महापूरात मोठी झाडे उन्मळून पडतात. मात्र पूर ओसल्यानंतर पात्रातील लव्हाळे डोके वर करून पुन्हा डोलु लागतात. त्याच कारण ते लवचिक असतात. मानवी कल्याणासाठी विचारांमध्ये कालसापेक्ष बदलांचे बुध्दांनी स्वागतच केले आहे.
देव आणि देवत्वाबद्दल विचार करतांना बुध्दांनतर आपल्याला महात्मा बसवण्णा सहज आठवतात.  या दोन्ही महापुरूषांनी प्रवाही राहण्याचा आग्रह धरलाय. परंतु बसवण्णांनी देव नाकारेला नाही. देवाचे स्वरूप, त्याची बंदीस्त चौकट नाकारत त्याला माणूस आणि माणूसकी केंद्रीत केले. बसवण्णा आणि शरणांनी शरीरात मंदिर पाहिला. श्रमात देव पाहिला. बसवण्णांनी प्रत्येकास कार्यनिरत – कार्यमग्न राहण्याचा आग्रह धरला. तोच कायक सिद्धांत होय. काम हेच ईश्वर असल्याचे सांगितले. ईश्वर प्राप्तीसाठी कोणतेही कर्मकांड, जप तप, तीर्थयात्रा, होम हवन करण्याची गरज नाही. आपले दैनंदिन काम निष्ठेने करणे हीच जीवनाची सार्थकता असल्याचे बसवण्णा सांगतात. चोरी करू नको, हिंसा करू नको, खोटे बोलु नको, रागावू नको, इतरांना त्रास देऊ नको, परनिंदा करू नको, आत्मस्तुती सांगू नको, खोरी स्तुती करू नको, हीच अंतरंग शुध्दी आणि हीच बहिरंग शुध्दी. इश्वराला प्रसन्न करण्याची हीच रीत होय. असा जीवनमार्ग बसवण्णा सांगतात. हा इश्वरप्राप्तीचा मार्ग असला तरी इश्वराची संकल्पना आणि स्वरूप शरणांनी स्पष्ट केला आहे. निराकार, निर्गुण इश्वरांची मांडणी शरणांनी केलीय. आकाशाच्या पलिकडे आणि पाताळाच्या पालिकडे असलेले, अगम्य, अगोचर शक्ती म्हणजे इश्वर अशी व्यापक संकल्पना बसवण्णांनी मांडलीय. तर दगड,माती,पाणी, नद्या, सोनं, पितळ सारख्या वस्तुंनी बनलेले देव देव नाहीत, तर ‘स्व’ची जाणीव झालेली व्यक्ती ही स्वत:च देव असल्याचे अल्लमप्रभुदेव सांगतात.
  तथागतांनी आचरण शुध्द ठेवण्याचा आग्रह धरला आहे. बसवण्णा आणि संतांचे एकूणच तत्त्वज्ञान अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धी अशा दोन्ही पातळीवर आहे. आयुष्य जगण्याची रीत बसवण्णांनी स्पष्ट केली आहे. शरणांची ही सप्तसूत्री आहे. जगातील सगळ्याच महापुरूषांनी कर्मकांड आणि कट्टरता नाकारून मानवी मूल्यांची उपासना करण्याचाच संदेश दिला आहे. आपण मात्र त्या महापुरुषांना कोंदणात मखरात बसवून, त्यांच्या समोर उदबत्त्या मेणबत्त्या लावून आरत्या करण्यात धन्यता मानतोय. अशा केवळ औपचारिक ठरलेल्या कृतीस वंदना कसे म्हणता येणार नाही.
म्हणूनच ‘धम्मम’ची मुलगी बुध्द अजोंबांच्या खांद्यावरील नातीसारखी वाटते. आजी अजोबांसोबत वाढलेल्या मुलांचे भावविश्व अधिक समृध्द असल्याचे बर्लिन विद्यापीठाने नुकतेच प्रसिध्दीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. आजोबापेक्षाही नातवंडांना खूप दूरच दिसत असत असल्याच मानलं जात. कारण ती अजोबांच्या खांद्यावर बसलेली असतात. अजोबांच्या खांद्यावर बसणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील साठ सत्तर वर्षाचा अनुभवातून धडे घेणे, वाट शोधणे असे म्हणता येईल. ते आजोबा साक्षात ‘तथागत’ असणे ही कल्पनाच भारी आहे. बुध्द अजोंबांच्या अंगा  खांद्यावर बागणारी नवी पिढी अधिक सक्षम, अधिक निकोप आणि विवेकी राहील. हा आशावाद नव्हे तर खात्री आहे. हाच आशावाद प्रा. डॉ.जयभिम शिंदे यांच्या कवितेने व्यक्त केलाय.
झेप घेऊ या खांदयावरुनी, बुध्द असा मळणार नाही
डोक्यावर तो मलिन होईल, वेडयांना कळणार नाही
देव नाही मी स्वतः म्हणाला, बहिर्‍यांना पटणार नाही
नातीच्या ओझ्याने माझा, बुध्द आज्जा दमणार नाही
इकडेही नवभक्त जन्मले, धम्म तया कळणार नाही
कैद दिली जर पंखांना या, बुद्ध सुध्दा उरणार नाही……..
चन्नवीर भद्रेश्वरमठ@ सोलापूर (लेखक बसव साहित्याचे अभ्यासक आहेत..9922241131)  फेसबुक वॉलवरून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button