वैशिष्ट्यपूर्ण कारणाने मंदिराची सर्व दूर प्रचिती
अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड )अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत श्री काशीविश्वेश्वर यांच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत आहे .श्रावण महिन्यात एक ते दीड लाख भाविक दर्शनासाठी श्री काशीविश्वेश्वर मंदिरात येत असून वैशिष्ट्यपूर्ण कारणाने मंदिराची सर्व दूर प्रचिती पसरली आहे.
श्री काशिविश्वेश्वर हे जेऊर गावचे ग्रामदैवत आहे. प्राचीनकाळी या गावात पृथ्वीच्या गर्भातून निरंतर गंगाजल उगम पावले आहे. दक्षिण भारतातील आपल्या जेऊर गावात साक्षात भगवान शंकराने स्वयंभू लिंगरूपात दर्शन दिले आहे म्हणून सुक्षेत्र काशिलिंग जेऊर गांव दक्षिण काशी या नावाने ओळखले जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे , प्राचीन काळी एक साधू महाराज नित्यनियमाने काशी यात्रा करीत असे. वाराणसीस्थित श्री काशिविश्वेश्वराचे दर्शन आणि गंगास्नान करीत असे. एकदा वाराणसी (काशी) येथे दर्शनास गेले असता गंगा नदीत पवित्रस्नान करीत होते. गंगामातेच्या पवित्र जलात पापविमोचनार्थ डुबकी मारत असताना त्यांच्या हातातील सोन्याचे कडे गंगा नदीच्या पाण्यात हरविले. त्या साधू महाराजांनी सोन्याच्या कड्याचा खूपवेळा शोध घेतला, पण त्यांना हरवलेले ते सोन्याचे कडे काही मिळाले नाही. निराश होऊन साधू महाराज गंगा नदीच्या किनाऱ्यावर गेले. त्या ठिकाणी वास्तव्यास असलेले साधूगण साधना करीत होते. या साधू महाराजांनीही गंगा किनाऱ्यावर साधना केली. एके दिवशी त्यांना दृष्टांत मिळाला, की तुझे हरवलेले सोन्याचे कडे भारताच्या दक्षिणेकडील एका गावातील स्वयंभू शिवलिंगाभोवती असलेल्या जलवलयात मिळेल. साधू महाराज वाराणसी (काशी) स्थित श्री काशिविश्वेश्वरांचे दर्शन करुन दक्षिणेकडे प्रवासाला निघाले. मजल दरमजल प्रवास करीत ते जेऊरगावी पोहोचले. जेऊर गावातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन करून लिंगाभोवती असलेल्या जलतिर्थाचे प्राशन करण्यासाठी हात घातले आणि काय आश्चर्य! वाराणसी (काशी) येथील गंगानदीत हरवलेले ते सोन्याचे कडे या जेऊर गावातील स्वयंभू शिवलिंगाभोवती असलेल्या जलतिर्थात सापडले. साधू महाराजांनी हि घडलेली अद्भुत गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. तेव्हांच गावातील लोकांना समजले की जेऊर गावातील स्वयंभू शिवलिंगाभोवती असलेले पाणी हे पवित्र गंगानदीचे पाणी आहे आणि तेव्हापासूनच जेऊर मधील या स्वयंभू शिवलिंगास श्री काशिलिंग अथवा श्री काशिविश्वेश्वर अशी ओळख मिळाली. नंतर त्याच साधू महाराजांनी हे काशिलिंगाचे सुंदर असे हेमाडपंथी मंदीर बांधले असे जाणकार सांगतात. श्री काशिविश्वेश्वराचे लिंग स्वयंभू व जागृत शिवलिंग आहे. स्वयंभू शिवलिंगाभोवती निरंतर गंगाजल आहे. या गंगाजलाच्या खोलीचा (तळाचा) अंत नाही. एकदा गावातील एका कुंभाराने या गंगाजलाचा तळ पाहण्यासाठी दगड बांधून सात बाजांची दोरी सोडली होती. तरी देखील गंगाजलाचा तळ लागला नाही. त्या नंतर त्या कुंभारावर श्री काशिविश्वेश्वराचा कोप झाला.
स्वयंभू शिवलिंगा भोवती असलेल्या गंगाजलातून कितीही पाणी काढले किंवा कितीही पाणी आत ओतले तरीही गंगाजलाच्या पाण्याची पातळी कमी-जादा होत नाही. तसेच मंदीरात सुंदर असे भलेमोठे बांधलेले हेमाडपंथी विहिर (बारव) आहे. विहिरीतील पाण्याची पातळी वर्षभरात सतत बदलत असते, पण स्वयंभू शिवलिंगाभोवती असलेल्या गंगाजलाची पातळी कधीही बदललेली नाही. पवित्र श्रावण मासात जेंव्हा गंगानदीला महापूर येतो, तेव्हा श्री काशिविश्वेश्वर मंदिरातील गर्भगृहात गंगामाता उफाळून येते. प्रत्यक्ष गंगामाता मंदिरात अवतरते. त्यावेळी गर्भगृहात गंगा नदीतील वाळू, शंख-शिंपले आणि दुधाळ गंगाजलाचे दर्शन घडते. त्या पाण्यास उग्र असा दर्प येत असतो. त्या दिवशी संपूर्ण पंचक्रोशीतील शिवभक्त गंगाजल तिर्थाचे प्राशन व दर्शन करण्यासाठी अलोट गर्दी करतात. सर्व शिवभक्त गंगाजलाचे आपापल्या स्वगृही नेऊन त्याची विधीवत पूजन करुन पुण्य कमावितात. शिवकृपा अनुभवतात. हे मंदिर गावाच्या नैऋत्य दिशेस आहे. या मंदिरात श्री गणेश, शिवपार्वतीचे प्रतिक जोडलिंग, श्रीमन नारायण, भवानी शंकर, भवानी माता, हनुमान, नंदी महाराज यांच्या मुर्ती तसेच अश्वथ वृक्ष आणि वटवृक्षही आहेत. चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढी पाडवा) या दिवशी सकाळी सुर्यदेव महाव्दारावरील खिंडीतून आपले चैतन्यमय किरण स्वयंभू शिवलिंगावर पाडून श्री काशिलिंगाचे दर्शन घेतात. अशा या स्वयंभू श्री काशिविश्वेश्वरांचे दर्शन घेतल्याने जीवन पुण्यमय व सुखी समाधानी होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.
श्रावणमास संपल्यावर येणान्या पहिल्या सोमवारी गावातून वाजतगाजत श्री काशिविश्वेश्वरांची पालखी निघते. वार्षिक यात्रा (रथोत्सव) – कार्तिक शुध्द प्रतिपदा (दिवाळी पाडवा) ते कार्तिक शुध्द पंचमी (पांडव पंचमी) या काळात वार्षिक यात्रा महोत्सव संपन्न होते. दिवाळी पाडवा ते पांडव पंचमी असे पाच दिवस लहान रथाची (उचई) रात्री मिरवणूक काढली जाते. कार्तिक शुध्द पंचमी (पांडव पंचमी) या दिवशी रात्री श्री काशिविश्वेश्वरांची भव्य रथयात्रा संपन्न होते. या रथयात्रेत मानाच्या नंदीध्वज काठ्यांची मिरवणूक होते. भव्य आतीषबाजी, गोंधळ कार्यक्रम, कुस्त्या, सामाजिक नाटक आणि याच पाच दिवसाच्या कालावधीत रात्री जेऊर महोत्सव म्हणून धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात.
श्रावण महिन्यात जेऊर येथे श्री काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , कर्नाटक आदी राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. श्रावण महिन्यात पहाटे पाच वाजता महारुद्र अभिषेक , काकडारती ,सकाळी नऊ वाजता नैवेद्य आरती यानंतर भाविकांनां महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम होत असतात. श्रावण महिन्यात मंदिरात एक महिना सप्ताह असतो. सायंकाळी साडेसात वाजता काकड आरती होते. सद्गुरु पांडुरंग महाराज यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यडयूर सिद्धलिंग यांच्या जीवनावर प्रवचन सुरू आहे. सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता लिंगपूजा ही काशी येथील वेदमूर्ती यांच्याकडून होणार असून यावेळी महाआरती होणार आहे. ट्रस्ट अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची वाटचाल सुरू आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी महांतेश गुरव यांनी दिली.महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर हे गाव श्री काशीविश्वेश्वरा मंदिराच्या मुळे वैशिष्ट्यपूर्ण कारणामुळे या गावची सर्व धूर प्रचिती पसरली आहे .श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे भाविक भक्तांचे श्रद्धास्थान ठरले आहे. यामुळे या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.