महाराष्ट्र

धुळ्यातील रोकड प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात १ कोटी ८४ लाखांची रोकड आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने बुक केलेल्या खोलीत सापडल्याने सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे धुळ्यातील प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणावरून सरकार व जिल्ह्यात आलेल्या विधिमंडळाच्या समितीवर टीकेची झोड उठवली होती. “धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे. त्याची सत्यता अजून समजलेली नाही. पण ही सत्यता बाहेर आलीच पाहिजे. विधिमंडळाची एखादी समिती कुठे जात असेल व तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. विधानमंडळाची आपली एक गरिमा आहे, मान आहे. अशा परिस्थितीत ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाचा ‘एसआयटी’मार्फत तपास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धुळे-नंदुरबार दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीला खूश करण्यासाठी ‘वर्गणी’ जमा करून ती रक्कम समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकाच्या नावे बुक असलेल्या धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत ठेवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी करत ठिय्या आंदोलन केले. यानंतर प्रशासन हलले व मध्यरात्री रोकडची मोजणी करण्यात आल्यनंतर तब्बल १ कोटी ८४ लाखांची रोकड सापडली. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत ‘एसआयटी’ स्थापन करणार असल्याचे जाहीर केले.

नीतिमत्ता समिती स्थापणार

विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती या दोघांनाही मी विनंती करणार आहे, की त्यांनी स्वतंत्र पद्धतीने एक नीतिमत्ता समिती बनवून या सर्व गोष्टीचा तपास करावा. ज्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होईल तिथे कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकारे विधिमंडळाच्या समितीची बदनामी होणे, हे सरकारला परवडणारे नाही. त्यामुळे या प्रकरणात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button