महाराष्ट्र

लोकराजे छत्रपती शाहू महाराज

आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. लाडवांची पुरचुंडी पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली.
आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलंच, म्हातारे, आज उशीरसा?’ माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात समोरुन मोटार येताना दिसली.

आजीने चटकन विचार केला, एस्.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू आजीने आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला. तो आजीकडे बघून हसला. “काय पायजे आजी?” त्यानं विचारलं. आजीला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, “माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? “यष्टी चुकली बग’ ड्रॉयव्हर खाली उतरला.

म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली, “ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?”

ड्रॉयव्हर हसत म्हणाला, “आजी, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी ”
आजीचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली.

बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्यानं पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, “अगे म्हातारे….. पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?

मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं, एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.

दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. “आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना?” आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली.

म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, “खा माझ्या पुता” ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं.

गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला,
“कुणाच्या गाडीतून इलंय?” “टुरिंग गाडीतनं.” आजी म्हणाली आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला.

तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली “तीन आणे मोजून दिलंय त्येका”, “त्यांनी ते घेतलं? अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. या आपल्या कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू ‘ दुसऱ्यानं माहिती पुरवली.

“अरेा माझ्या सोमेश्वरा, खळनाथा” म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिनं भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय’ म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button