करमाळ्याच्या जागरूक नागरिकांनी पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर

काश्मीरबाबत अमेरिकेची मध्यस्थी मान्य नाही
युद्ध नको, बुद्ध हवा
करमाळा ( आयुब शेख )करमाळ्यातील जागरूक नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. परिख, मेधा पाटकर, तुषार गांधी आणि इतर 50 सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनावर ॲड. सविता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यात पंतप्रधानांच्या नावे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम येथे दहशतवादी टोळीने 22 एप्रिल 2025 रोजी 27 भारतीयांची हत्या केल्याने देश संतप्त आहे. पर्यटकांना वाचवण्याच्या प्रयत्नात आदिल हुसेन शाह शहीद झाले.
पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या सैनिक आणि नागरिकांना नमन! आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
धैर्यवान हिमांशी नरवाल यांनी लेफ्टनंट विनोद नरवाल यांच्या हत्येचा धक्का सहन करत देशवासियांना मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध न बोलण्याचे, शांतता राखण्याचे आणि न्याय देण्याचे आवाहन केले. जम्मू आणि काश्मीरमधील सर्व नागरिक, संघटना, पक्षांनी एकजुटीने दहशतवादाविरुद्ध आवाज उठवून हे सिद्ध केले की देश हिंसा-द्वेषाच्या विरोधात आणि अहिंसा व शांततेच्या बाजूने उभा आहे.
आम्हाला देशात कुठेही धर्म, जात, लिंग, रंग, भाषा किंवा विकासाच्या नावाखाली होणारी हिंसा मान्य नाही. कोणाच्याही सन्मानाने जगण्याच्या अधिकाराला हिरावणे हीसुद्धा हिंसा आहे. भारताचे संविधान याला परवानगी देत नाही.
याच संदर्भात आम्ही, भारताचे नागरिक, देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी आमच्या बांधिलकीची पुनरुक्ती करत, शेजारील देश पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत खालील मुद्द्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो:
शेजारी देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करत शांततापूर्ण सह-अस्तित्व ही आमच्यासाठी मूलभूत गरज आहे. युद्धांऐवजी युद्धबंदी, तथ्यांवर आधारित तर्कसंगत संवाद आणि कराराची वाट स्वीकारण्याच्या धोरणानेच समाधान शक्य आहे.



