मास्टर भगवान

-
जन्म: १ ऑगस्ट १९१३; मृत्यू – ४ फेब्रुवारी २००२
“शोला जो भड़के, दिल मेरा धडपे” हे गाणं लागल्यावर आजही सगळ्यांची पाय थिरकतात. अलबेला या सुपरहिट हिंदी सिनेमातील हे गीत आणि हे गाणं ज्यांच्यावर चित्रित झाल ते नायक म्हणजे अलबेला मस्ताना’ अशी हिंदी चित्रपट जगतामध्ये ओळख असणार्या मास्टर भगवान यांचे. ‘अलबेला’ गाजली तो त्यातील गाण्यांमुळे आणि भगवानदादांच्या डान्समुळे, भगवानदादांनी हिंदी सिनेमा मध्ये नाचण्याची जी काही स्टाईल आणली त्याने पुढल्या अनेक नायकांना गाण्यामधला नाच सोपा गेला. मास्टर भगवान तथा भगवान दादा पालव यांचे हिंदी सिनेमाच्या क्षेत्रातील कर्तृत्व फार मोठा आहे आहे तब्बल ६५ वर्ष ते या मायानगरी मध्ये होते. सिनेमाच्या बेहिशेबी दुनियेत त्यांनी कलेचं सर्वोच्च टोक गाठलं होतं. माया नगरीतला जीवघेणा चढ-उतार कित्येक कलावंताच्या पदरी येतो. बरेचजण त्याने खचून जातात, हताश होतात. आयुष्यातली ही खेळी पराभूत झाल्याने काही जण आयुष्यच संपवायला निघतात. पण यातही काही जिंदादिल, ताठ कण्याचे असतात जे पराभवाने विचलित न होता पुन्हा मार्गस्थ होतात आणि पुन्हा नव्याने डाव मांडू लागतात. आपल्या अनोख्या नृत्य शैलीने आणि स्टंटपटाने सार्या सिनेजगताला वेड लावणार्या मा.भगवान या कलावंताचं आयुष्य देखील याहून फार वेगळं नव्हतं.
भगवान दादांचा जन्म १ ऑगस्ट १९१३ रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भगवान आभाजी पालव होते. त्यांचे वडील कापड गिरणीत कामगार होते. भगवान दादांचे वडील मुंबईतील दादर येथील एका चाळीत कुटुंबासह राहत होते. भगवान दादांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती आणि त्यांचे चित्रपटांवरील प्रेम कधी ध्यास बनले हे त्यांना कळले ही नाही. भगवानदादा चौथीच्या वर्गात होते तेव्हा त्यांनी शिक्षण सोडून मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र, आता ते चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पाहू लागला होते.
हा तो काळ होता जेव्हा भारतात मूकपट बनले होते. भगवान दादांना मूकपटांमध्ये अभिनेता आणि सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मग त्यांच्या समर्पणामुळे भगवानदादा लवकरच त्या काळातील चित्रपटसृष्टीत मोठे नाव बनले. भगवान दादांना कुस्तीची खूप आवड होती हे फार कमी लोकांना माहिती असेल. ते स्वतः कुस्ती करायचे आणि कुस्तीच्या सामन्यांमध्ये त्यांना खूप रस होता. त्यांच्या या छंदामुळे त्यांना पहिल्यांदा क्रिमिनल चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९३० मध्ये दादांना कॉमेडियन म्हणून ‘बेवफा आशिक’ हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र ‘बेवफा आशिक’ या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी आपल्या ‘जनता जिगर’ या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला.
१९५१ ला रिलीज झालेल्या ‘अलबेला’तील एकाहून एक “सुपरडुपर हिट’ गाणी आणि त्यावरील खास “भगवान-डान्स’ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील ‘भोली सुरत दिल के खोटे’ हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्याला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. “चोरी चोरी’, “झनक झनक पायल बाजे’ या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या. आजही तुम्हाला भगवान दादांच्या नृत्यशैलीचे लाखो चाहते पाहायला मिळतील. फिल्म इंडस्ट्रीत कोरिओग्राफर त्यांच्या डान्सला भगवान दादा मूव्ह्स म्हणतात. अमिताभ बच्चन, गोविंदा आणि मिथुन यांसारख्या स्टार्सनीही नृत्यासाठी भगवान दादांकडून प्रेरणा घेतली. भगवान दादांनी स्वतः ऋषी कपूर यांना त्यांच्या स्टेप्स शिकवल्या. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना अतिरिक्त नर्तक न मिळाल्याने त्यांनी चित्रपटात फाईट सीन्स करण्यासाठी आलेल्या फायटरला डान्स करायला लावला. ४ फेब्रुवारी २००२ रोजी दादर येथील त्यांच्या चाळीत वयाच्या ८८ व्या वर्षी भगवान दादांनी अखेरचा श्वास घेतला. भगवान दादांच्या स्मरणार्थ २०१६ मध्ये त्यांच्या जीवनावर एक अलबेला नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता. भगवान दादांना हे जग सोडून बरीच वर्षे झाली. पण आजही त्यांच्या नृत्यशैलीने आणि अभिनयाने लोक प्रभावित झाले आहेत.
अभिनेते मास्टर भगवान यांना जयंती निमित विनम्र अभिवादन !