शैक्षणिक
के. बी. एन.माध्यमिक आश्रमशाळा नागनळळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

शिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य –
एस टी पाटील
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
शैक्षणिक जीवनात गुणवत्तेबरोबरच आचरण महत्त्वाचे आहे. शालिनीता, चारित्र्यसंपन्नता,वक्तशीरपणा हे विद्यार्थ्यांची लक्षणे आहेत. आपण ठरवलेल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून अभ्यासाचे योग्य नियोजन केले तर यशाचा मार्ग सापडतो असे मत अक्कलकोट येथील मंगरूळ हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस टी पाटील यांनी केले.
के. बी. एन.माध्यमिक आश्रमशाळा नागनळळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य इस्माईल मुजावर,मुख्याध्यापक रईस शेख, वसतिगृह अधीक्षिका मंजुषा चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.शिवाजी चव्हाण, प्रा.रवींद्र नवले,10वी वर्गशिक्षक मोहन गुरव हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते थोर समाज सुधारक महात्मा फुले व पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज बिराजदार यांनी केले. स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. १० वी वर्गातील ऐश्वर्या चव्हाण,भाग्यश्री बिराजदार,व विलास इटेनवरू या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अल्पावधीतच नागनळळी आश्रम शाळेने केलेली प्रगती हे वाखण्याजोगी आहे. वसतिगृहातील सुख सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, शैक्षणिक दर्जा याचे कौतुक करून संस्थेचे सचिव जावेद पटेल यांचे विशेष अभिनंदन पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी प्राध्यापक शिवाजी चव्हाण व प्राचार्य इस्माईल मुजावर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेतील संगीत शिक्षक रुद्राक्ष वैरागकर यांनी भक्ती गीत व कविता गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभूलिंग बशेट्टी यांनी केले तर आभार मोहन गुरव यांनी मांनले.