सोलापूर
जन्मेजयराजे भोसले यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पत्रकार हे समाजासाठी २४ तास कार्यरत : ना. मोहोळ
सोलापूर : ( प्रतिनिधी ) पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ आहे. २४ तास पत्रकार हे समाजासाठी कार्यरत असतात. चांगला असो किंवा वाईट प्रसंग असो कुठल्याही काळात ते नि:पक्षपणे रस्त्यावर कार्यरत असतात. अशा पत्रकारांचा गौरव हा समाजातील सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा
जीवन गौरव, पत्रकारिता सन्मान सोहळा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचा पदग्रहण समारंभ केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हॉटेल सरोवर येथे थाटात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विचारमंचावर आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळये , दैनिक पुण्यनगरीचे आवृत्तीप्रमुख व्यंकटेश पटवारी, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदींचा मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले, आज सोलापूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा दिवस आहे. देशाच्या विमान क्षेत्राशी आता सोलापूरचे नाव जोडले गेले आहे. सोलापुरातून देशभरात विमानाने जाता येईल असा हा ऐतिहासिक दिन आहे. राज्य मराठी पत्रकार संघाशी माझे जुने नाते आहे. राज्यभरात या संघाचा मोठा विस्तार आहे. पत्रकार हे समाजासाठी मोठे योगदान देतात. कोविड काळातही सर्वजण घरात बसले असताना तशा बिकट परिस्थितीतही पत्रकार हे समाजासाठी कार्यरत होते. त्यांचा सन्मान व कौतुक होणे हे समाजातील इतरांसाठी आदर्शवत आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आणि पालकमंत्री गोरे यांनी आपल्या भाषणात श्री जन्मेजयराजे भोसले यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी प्रास्ताविक भाषणात जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळाली पाहिजे. सोलापुरातून मुंबई, तिरुपती, हैदराबाद विमान सेवा सुरू व्हावी. बोरामणी विमानतळ सुरू करण्यात यावे. उजनीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आदी मागण्या मांडल्या. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर अभिषेक आदेप्पा यांनी आभार मानले.
याप्रसंगी कार्यक्रम स्थळी चित्रकार विपुल मिरजकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्या पत्नी अमृता फडणवीस यांचे रांगोळी द्वारे आकर्षक छायाचित्र रेखाटले होते. यावेळी चित्रकार मिरजकर यांनी
धाग्यांनी विणलेले छत्रपती शिवरायांचे पोट्रेट मंत्री मोहोळ यांना भेट दिले.
चौकट –
पत्रकारांकडून समाजाची व्यवस्था
बदलण्याचे कार्य : पालकमंत्री गोरे
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,
जनजागृतीच्या माध्यमातून समाजाची व्यवस्था बदलण्याचे काम पत्रकारांकडून घडते. मराठी पत्रकारितेत प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी चांगले काम केले आहे. पत्रकारितेची उंची वाढविण्याचे कार्य सत्कारमूर्ती पत्रकारांनी केले आहे. राजकारण्यांचा ब्रेक पत्रकारांच्या हाती असतो. त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
या मान्यवरांचा झाला पुरस्काराने गौरव
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने
एबीपी माझा मुंबईच्या संपादिका सरिता कौशिक, दै. सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, झी २४ तासचे कोल्हापूर ब्युरो चीफ प्रताप नाईक, टीव्ही ९ मराठीचे पुणे ब्यूरो चीफ योगेश बोरसे, न्यूज १८ लोकमतचे मुंबई मंत्रालयातील वरिष्ठ पत्रकार राहुल झोरी यांना गौरविण्यात आले. श्री विठ्ठल मूर्ती, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व रोप असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
