टॉप न्यूज

मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

 

मुंबई – बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे  मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.”

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखतील, असा इशारा आज विरोधकांनी दिला होता.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. २७ फेब्रुवारी रोजी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र सादर केले, ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांचा समावेश आहे. बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या, आवदा कंपनीला खंडणी मागण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button