शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविण्यासाठी ध्येय निश्चित करावे -डॉ श्रीकांत येळेगावकर

कल्याणशेट्टी महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळाचा शुभारंभ कार्यक्रम
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविण्यासाठी मोठी स्वप्ने पहिली पाहिजेत, त्यासाठी अंगभूत कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. त्यामुळे जीवनाची वाटचाल सुखकर होऊ शकते, त्यासाठी सामाजिक शास्त्राचे अध्ययन देखील महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन डॉ श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विषयांतर्गत इतिहास, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र मंडळाच्या वर्षभरातील कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ‘चला घडवूया स्वतःला’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते
बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते तर व्यासपीठावर इतिहास संशोधिका डॉ नभा काकडे, फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ नागनाथ तेली, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सामाजिक शास्त्र विषयामुळे विद्यार्थी घडतो, स्पर्धा परीक्षा देण्यास प्रवृत्त होतो, देश सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवतो म्हणून राज्यशास्त्र, इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय महत्त्वाचे असून त्या विषयाचे अध्ययन करावे.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवत असताना अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे, ध्येय साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजे, त्यामुळे यश निश्चित प्राप्त होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले तर आभार प्रा डॉ बाळासाहेब पाटील यांनी मानले.
