महाराष्ट्र

गर्दीच्या नियोजनासाठी यंदा पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष, दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी, बस मार्गात देखील होणार बदल

पुणे – राज्यभरातील वारेकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे १९ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. लाखो वारकरी या भक्तीपूर्ण सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. पुणे पोलिसांकडून एआयची व्यवस्था विश्रांतवाडी, संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवे घाट या प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
 श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २० आणि २१ जून रोजी पुण्यात मुक्कामासाठी आहे. २२ जून रोजी पहाटे हडपसरमार्गे सासवडला आणि लोणी काळभोरला मुक्कामी पोहचेल. त्यामुळे या मार्गावरील बस मार्गात बदल केला आहे. पुण्यातून सासवडला पालखी सोहळा जाताना प्रवासी, भाविकांसाठी ६० जादा बसेचे नियोजन केले आहे. 
 २२ जून रोजी दोन्ही पालख्या दुपारी १२ ते १ दरम्यान हडपसर येथे थांबतात. त्यामुळे महात्मा गांधी स्थानकातून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बस व्यवस्था केली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बस उपलब्ध होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button