टॉप न्यूज
ऐन पावसाळ्यात अक्कलकोट शहरास दहा दिवसाआड पाणीपुरवठा !

अक्कलकोटकरांचा पाण्याचा वनवास संपेना ! अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीस ऐन पावसाळ्यात नगरपरिषदेकडून दहा दिवसात पाणीपुरवठा होत असून पाणी असो अथवा नसो अक्कलकोटकरांचा पाण्याचा वनवास मात्र अद्याप पर्यंत संपण्यास तयार नाही. नगरपरिषदेत मुख्याधिकारी नव्याने रुजू होतात आणि आपला कार्यकाळ संपला की निघून जातात. केवळ आश्वासनांच्या खैराती आता नको असा आवाज जनतेतून येत आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीचा नावलौकिक हा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे व समाधीमुळे जगभर पसरला आहे. या समर्थांच्या नगरीला पाणी असो अथवा नसो नगरपरिषदेकडून दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरू असून कुरनूर धरणात 28 ते 30 टक्के पाणी आहे. इतके मुबलक पाणी असताना नगरपरिषद प्रशासनाकडून अक्कलकोटकरांना दहा-बारा दिवसाआड पाणीपुरवठा करून त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा प्रकार होत आहे. पाणी जर मुबलक नसताना टंचाईच्या काळात जर पाणीपुरवठ्यास विलंब झाला तर त्यास कोणतीच हरकत नाही. पण सध्या कुरनूर धरणात मोठा जलसाठा असताना नगरपरिषेकडून दहा दिवसाआड पाणीपुरवठा करून नागरिकांवर अन्याय करण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत नगर परिषदेच्या मागील काळातील मुख्याधिकारी यांना विचारल्यास निधी नाही काम चालू आहे स्टोरेज टाक्या नाहीत ही गुळगुळीत उत्तरे आजपर्यंत अनेक वर्षांपासून मिळत आले आहेत. कुरनूर धरणातून सध्या अक्कलकोटातील नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे .पूर्वी हिळळी जलाशयातून पाणी उपसा करून अक्कलकोटला पाणीपुरवठा करण्यात आला होता, हिळळी अक्कलकोट जलवाहिनीची पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने ही पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आली.सध्या हिळळी बंधार्यात वीर धरणातून पाणी सोडल्याने हा बंधारा ओवर फ्लो झाला आहे. याठिकाणचे पाणी कर्नाटकात जात आहे. सर्वत्र मुबलक पाणी असताना नगरपरिषद प्रशासनाने निदान अक्कलकोटकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे .अक्कलकोट शहरात अनेक ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणीचे काम सुरू आहे. पण ठेकेदारांकडून सदरचे काम संथगतीने सुरू आहे .या कामाची चौकशी नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी करावी. सध्या कुरनूर धरणातील पाणीसाठा पाहता नगर परिषदेने तीन चार दिवसाआड अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करावा जेणेकरून अक्कलकोटकरांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार नाही. नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
