अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरात नगर परिषदेकडून रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी नगरपरिषदेने रस्त्याच्या बाजूला असणारी जुनी झाडे तोडल्याने आता नागरिकांतून नगरपरिषद वृक्ष संवर्धनाकडे लक्ष देईल का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अक्कलकोट शहरातील मंगरूळ हायस्कूल ते कारंजा चौकापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. नगरपरिषदेने या रस्ते रुंदीकरणासाठी शेकडो झाडे तोडली आहेत.यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात सावलीसाठी झाडे शोधावी लागत आहेत. शहरातील फत्तेसिंह मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला नगर परिषदेकडून लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड करण्यात आली होती. रस्ते रुंदीकरणाच्या कामात या ठिकाणची शेकडो झाडे तोडण्यात आली. तसेच मंगरूळे हायस्कूल ते जेऊर रोड पर्यंत रस्ते रुंदीकरण करण्यात आले. यावेळी ही वृक्षांची कत्तल करण्यात आली. शहरातील कारंजा चौक ते सोलापूर बायपास रस्त्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आला. यावेळीही वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले. अक्कलकोट शहरात नगर परिषदे कडून रस्ते रुंदीकरण करताना शेकडो जुनी वृक्षांची कत्तल करण्यात आली. पण नगरपरिषदेने नव्याने कोणत्याच ठिकाणी वृक्ष लागवड केल्याचे दिसत नाही .एकेकाळी शहरात देशी वृक्षांची सावली ही नागरिकांना आधार देत होती. पण नगर परिषदेने रस्ते रुंदीकरणासाठी देशी जुने वृक्ष तोडल्याने नागरिकांना सावली शोधावी लागत आहे.नगरपरिषदेकडून रस्ते रुंदीकरण सुरू असलेल्या ठिकाणी वृक्षांच्या लागवडीसाठी कोठेच जागा सोडण्यात आली नाही. अक्कलकोट नगर परिषदेचे वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट नगरीचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व मुख्याधिकारी रमाकांत डाके हे अक्कलकोट नगरीस ग्रीन सिटी बनविणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे. अक्कलकोट शहराच्या विकासासोबत वृक्ष संवर्धनासाठी नगर परिषदेने योगदान द्यावे अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.