कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे आक्रमक; शेतकऱ्यांना दिलासा द्या– कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन दिले निवेदन

नवी दिल्ली -सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कांदा उत्पादक शिष्टमंडळासोबत निवेदन सादर केले.
यावेळी त्यांनी सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटाला सामोरे जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी असून, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल केवळ ७०० ते १००० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती तातडीने हाताळण्याची गरज असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी आणि केंद्र सरकारच्या अपुऱ्या निर्यात धोरणांमुळे कांदा निर्यात घटली असून, बाजारातील मागणी कमी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.
या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी कृषिमंत्र्यांकडे ठोस मागण्या मांडल्या.
🔳. शेतकऱ्यांकडून कांद्याची थेट खरेदी करून हमीभाव द्यावा, खरेदी शक्य नसल्यास प्रति क्विंटल किमान 1000 रुपयांचे थेट अनुदान (DBI) देण्यात यावे,
. तसेच कांदा निर्यात तातडीने सुरू करून बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम असून, केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी रणजीत पाटील, महेश चव्हाण, शेखर पाटील आदी उपस्थित होते.

