सामाजिक

विद्यार्थ्यांनो जागृत व्हा! -डॉ. .बी. आर. आंबेडकर

सवर्ण लोकांपेक्षा आम्ही निरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही. कारण आज सर्व सत्ताधारी पुढारलेलेच वर्ग आहेत. नोकरी मागण्यास कोणत्याही ऑफिसात गेल्यास तेथे असलेले वरीष्ठ अधिकारी आपल्याच गोतावळ्याचा भरणा करतात हे उघडे नागडे सत्य आहे. नुसत्या बी.ए. होण्यामुळे तुम्हास नोकरी मिळणार नाही. पुढारलेल्या जातींच्या लोकांशी स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही. पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाहीत. उलट आज शेकडो वर्षे असे आपणास व आपल्या बापाजाद्यांस त्यांनी दाबले तसेच ते तुम्हास दाबल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की, त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत. अडाणी आईबापांच्या पोटी जन्म घेऊन जर बी.ए. झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा.

मी प्रथमच बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महारडा बॅरिस्टर म्हणून मला पुढारलेला वर्ग हिणवत असे. परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत. आपणांस चांगले दिव्य केल्या शिवाय महत्व येत नाही. इतर समाजाचे तसे नाही. ज्यावेळी आपण सोन्याच्या मोलाचे कार्य करू तेव्हा कोठे इतर वर्गाचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचे समजतील,आणि त्यांनी कथलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्यास सोन्याच्या मोलाची किंमत येत नाही. हा तर आज व्यवहार होऊन बसला आहे. आपण असे पहातो, जर एखाद्या महारीण अगर मांगीण अगर चांभारीन बाईने सोन्याचे दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे अशी समज इतर म्हणविणारे वर्ग करून घेत असतात. याउलट पुढारलेल्या लोकांच्या स्त्रियांनी दागिने वापरले तरी ते सोन्याचेचे असावेत हा समज दृढ झाला आहे. तद्वतच इतर बाबतीतही आपले असेच आहे. आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशः चांगले करू तेव्हा कोठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ

हे सर्व करण्यासाठी आम्ही आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आपला आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यास आखाड्यात उतारलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की, ‘मी जे करीन ते होईन’ अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून करीत असतो. माझ्या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतात. परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. मी तुमच्या सारखाच एका महारीण बाईच्या पोटी जन्मास आलो आहे. गरिबीच्या दुष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला अनुकूलता होती असे नाही.

मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई बाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर हे एवढे करू शकतो तर तुम्हास आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल?

कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.

मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्षे लागतात तो अभ्यास मी २ वर्षे ३महिण्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी मला २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी २४ तासांपैकी सारखा १८ तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो. अलिकडच्या तरूणाला तर अर्धातास सारखा बसला की, चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते, नाहीतर सिगारेटस् ओढीत हात पाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयात सुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button