सामाजिक
तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; प्रकाश आंबेडकरांचा आरएसएस वर घणाघाती हल्ला

मुंबई: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून आरएसएस (RSS) आणि तेलंगणा सरकारवर संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तेल्लापूर येथील महात्मा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा हल्ला केवळ एका पुतळ्यावर नसून तो सामाजिक समतेच्या विचारधारेवर झालेला हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
हा ‘मनुवादा’चा पुतळा पाडण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर
या घटनेवर संताप व्यक्त करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी यामागे आरएसएसचा हात असल्याचा म्हटले आहे. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा केवळ जोतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. आरएसएसला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो.
पुढे ते म्हणाले, आरएसएसला फक्त मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवर झालेला आघात आहे. या घटनेनंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना टॅग करत विचारले की, तुमच्या राज्यात अशा घटना वारंवार का घडत आहेत? तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात?
प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे की, हा देश फुले, शाहू आणि आंबेडकरवादी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही. तसेच ‘आरएसएस मुर्दाबाद’ आणि ‘मनुवाद मुर्दाबाद’ अशा घोषणा देत त्यांनी आपला निषेध नोंदवला.




