सामाजिक

निर्दोष जीवन जगण्याची जीवनशैली

जात्यंतक क्रांती शिवाय समाजवाद येणार नाही हे अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “annihilation of caste” या ग्रंथातून कम्युनिस्टांना बजावले आहे. तर तथागत सम्यक संबुद्धाने सांगितले की वनस्पती व प्राणीसृष्टीत जाती असल्या तरी त्या मनुष्य सृष्टीत नाहीत. पूर्वी युद्धातील पराजीतांना गुलाम करुन राजे त्यांचा व्यापार करीत, सामंती श्रेष्ठी व राजे यांच्याकडून या गुलामांना,दासींना दहेज म्हणून बक्षिस म्हणून देण्याची त्या काळी प्रथा होती, मनुष्य सृष्टीतील ही अनिष्ट प्रथा बुद्धाने मोडीत काढली. शाक्य, कोलीय या गणाचा पाणीवाटपाचा संघर्ष हा शेती उत्पादनासाठी व अतिरिक्त मूल्यासाठीचा संघर्ष होता. बुद्धाने या अतिरिक्त मुल्यांच्या विरोधात मुल्यविहीन होणाऱ्या शेती उत्पादन मुल्यांच्या बचावासाठी संघर्ष उभा केला व अतिरिक्त खाजगी मालमत्तेच्या गणप्रणीत संकल्पनेच्या विषमता विरोधी धोरणाच्या विरुद्ध बुद्धाने क्रांतिकारी उठाव केला. आर्थिक समतेच्या लोककल्याणकारी समाजवादाच्या प्रस्थापनेसाठी भांडवली संचयवृत्तीच्या अर्थशास्त्रीय युद्धाला शास्त्रीय छेद देणाऱ्या इतिहासातील पहिल्या क्रांतिकारी बंडाचे नेतृत्त्व प्रथम बुद्धाने केले.मार्क्सने अतिरिक्त मुल्यांच्या सिद्धांताची मांडणी केली तर डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्क्सच्या surplus value च्या उणिवेवर संशोधन केले व राज्यशासीत लोकशाही समाजवादाचा समर्थ पर्याय उभा केला.सम्यक संबुद्धांनी फक्त दुःखाचा शोध लावून त्यावर उपाय सांगितले आहेत का? त्यांनी फक्त व्यक्ती मुक्तीचाच मार्ग स्वीकारला होता का? लोकशाही बळकट आणि सुदृढ होण्यासाठी बुद्धांनी स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ही तत्वे स्वीकारली होती.पण ही तत्वे अभ्यासक दुर्लक्षित करून बुद्धाच्या धम्माची आध्यात्मिकदृष्ट्या चर्चाच करताना दिसले. अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातील बौद्ध धम्माचे स्वरूप हे फक्त व्यक्तीला मुक्ती देणारे नव्हते, तर या जगाची पुनर्रचना करणाऱ्या एका क्रांतिकारी विचाराचे होते.

बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बाबासाहेबानी ब्रम्हां सहंपती आणि भगवान बुद्ध यांचा संवाद सांगितला आहे, आणि शेवटी म्हटले आहे की, हे ब्रम्हा,जगातील सर्व धर्म हे जगाची निर्मिती कशी झाली याची माहिती देताना दिसतात,परंतु माझा धम्म,हे जग कसे बदलायचे,ते अधिक कसे चांगले करायचे याची शिकवण देतो”.म्हणून बाबासाहेबांचा बौद्ध धम्म, हा एक नवा माणूस,नवा समाज व नवी संस्कृती निर्माण करण्याची प्रेरणा देणारा एक क्रांतिकारी विचार आहे.पण याकडे अजूनही अभ्यासक, समतेचे विचार सांगणारे, तसेच विचारवंत ही गांभीर्याने पहात नाही हे खेदजनक आहे. १२ मे १९५६ रोजी BBC ला मुलाखत देताना बाबासाहेब म्हणाले होते,” दुर्दैवाने बुद्धांच्या शिकवणुकीचे योग्य तर्हेने विश्लेषण केले गेलेले नाही, बुद्धांची शिकवण म्हणजे समाज सुधारणा घडवून आणण्याचे तत्वज्ञान होते ही बाब पूर्णपणे लोकांना समजलेली नाही”.

बुद्धाने फक्त क्रांती केली नसून ऐतिहासिक अशी “वैज्ञानिक समाजक्रांती” जन्माला घातली. बुद्धाने समुद्रपार व्यापाराचे प्रयोजन केले परंतु वैदिकांनी समुद्र भ्रमनाला निषिद्ध मानले. सुत्तनिपात मधील महामंगल सुत्तामध्ये महिलांच्या परिश्रमाचा अर्थव्यवस्थेतील वाटा निश्चित करण्यासाठी बुद्धाने स्वीदास्यांताच्या आर्थिक कार्यसंबंधी उपदेश दिला. बुद्धाने स्वीदास्य जातवर्ण, वर्गवंश धर्मसत्ताक, दासकर्मकर, गुलामांच्या आर्थिक मुक्तीची क्रांती केली. बुद्धाने ही क्रांती राजेशाहीच्या, ब्राम्हणी सत्तेच्या,भांडवली सत्तेला आव्हान देत वरकड शेतजमीन,मिरासदार , उच्चभुंच्या विरोधात केली. त्यामुळे बुद्धाला फक्त धर्म सिद्धांतात व पुजापाठाच्या कर्मविधी समारंभात कोंबणाऱ्यांनी आपल्या कृती कार्यक्रम पत्रिकेवर बुद्धाची ही ऐतिहासिक श्रम उत्पादन मूल्यवृद्धीची जात्यंत्तक गुलामांच्या मुक्तीची आर्थिक क्रांती नीट अभ्यासून लढविली पाहिजे. नव्या अर्थव्यवस्थेला , जागतिकीकरणाला समर्थ पर्याय देणाऱ्या बुद्धाच्या धम्मशक्तीचे क्रांतिकारी प्रबोधन जगभरच्या चळवळींना पुरविले पाहिजे, बुद्धाची समाजक्रांतीच जगाची पुर्नरचना करण्याचे समृद्ध सामर्थ्य घेऊन उभी आहे . तिला रक्तरंजीत क्रांतीची गरज नाही.प्रतित्य समुत्पाद मांडणारा बुद्ध हे जगातील पहिले विकासवादी तत्वज्ञानी आहेत.अल्बर्ट आईनस्टाईन सारख्या शास्त्रज्ञाने बुद्धाला वैज्ञानिक म्हटले आहे, आईनस्टाईन म्हणतात की, if there is any religion that would cope with modern scientific needs it would be Buddhism”

भारतीय घटनेतील secular शब्दाचा अर्थ शब्दसुचिमध्ये “धर्मनिरपेक्ष” असा जरी दिला असला तरी,या शब्दाचा खरा अर्थ “इहवाद” असा आहे, आपले संविधान धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगितले जाते,पण ज्यांना धम्म डोळस दृष्टीने पहायचा नसतो त्यांनीच हे धर्मनिरपेक्षतेचे काळे चष्मे तयार केलेले आहेत. कारण धम्म म्हटलं की ज्यावर धर्म उभा आहे अशा सर्व संकल्पना मोडीत निघतात.मग जेथे धर्म नाही तेथे धर्मनिरपेक्षता कशी असेल? त्यामुळे secular चा अर्थ इहवाद घेतला की,निर्दोष जीवन जगण्याची जीवनशैली म्हणजेच निर्वाण किंवा निब्बाण असाच अर्थ घ्यायला हवा.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button