महाराष्ट्रात लहान मुले पळवून नेणे किंवा बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या

मुंबई – महाराष्ट्रात लहान मुले पळवून नेणे किंवा बेपत्ता होण्याच्या घटनांनी आता केवळ चिंतेचा विषय असून आता या प्रकाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2024 या केवळ तीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बेपत्ता बालकांचे प्रमाण तब्बल 30 टक्क्यांनी वाढले आहे. या भयावह वाढीमुळे राज्यातील प्रत्येक पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज ठाकरेंनी केवळ अधिवेशन किंवा चर्चा नव्हे, तर ठोस आणि तातडीची कृती करण्याची मागणी केली आहे,
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही..
महाराष्ट्रातील भयावह स्थिती
एनसीआरबीची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात दररोज सरासरी 20 हून अधिक मुले बेपत्ता होत आहेत. याचा अर्थ, दर तासाला किमान एका बालकाचा पत्ता लागत नाहीये. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण (विशेषतः 12 ते 18 वयोगटातील) चिंताजनक आहे,
बेपत्ता मुलांपैकी काही मुलांचा शोध लागतो, पण बेपत्ता मुलांचा एक मोठा गट असा असतो ज्याचा वर्षानुवर्षे पत्ता लागत नाही. पोलीस अनेकदा या केसेसची नोंद ‘पळून जाणे’ किंवा ‘हरवणे’ अशी करतात, ज्यामुळे अपहरणाचे खरे आकडे कमी दिसतात. हीच बेपत्ता मुले नंतर मानवी तस्करीच्या (Trafficking) जाळ्यात अडकतात.



