खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे येत्या १५ ऑक्टोबर रोजी देशभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपाइं च्या दोन दिवसीय विचारमंथन शिबिरात अनेक ठराव मंजूर
महाबळेश्वर -खाजगी उद्योग क्षेत्रातील कंपनी आणि शिक्षण क्षेत्रातील स्वायत्त विद्यापीठे आदी.सर्व खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण धोरण लागू करावे.खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे या मागणी साठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज केली.
महाबळेश्वर येथील हॉटेल ऐश्वर्या मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन दिवसीय विचारमंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात राज्यातील प्रमुख साहित्यिक आणि विचारवंत तसेच रिपाइं चे निवडक नेते या विचारमंथन शिबिरात उपस्थित होते.या शिबिराच्या समारोपा नंतर विचारमंथन शिबिरात झालेल्या विविध ठरावाची माहिती पत्रकारांना देताना ना.रामदास आठवले यांनी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपाइं तर्फे देशभर आंदोलनाची घोषणा केली.
आरक्षण हे संविधानाच्या अनुसूची ९ मध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा कायदा संसदेत करण्यात यावा त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक सर्व क्षेत्रात आरक्षणाला धक्का लागणार नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून अन्य राज्यांनी पदोन्नती मध्ये आरक्षण लागू केले असून महाराष्ट्रात ही पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे;विनाअनुदानित तत्वावरील महाविद्यालयांना शाळांना अनुदान द्यावे.त्यासाठी कायम विनाअनुदानित हे तत्व शासनाने रद्द करून शाळा आणि महाविद्यालयांना अनुदान दिले पाहिजे;राज्यातील विद्यापीठांमध्ये एकही बौद्ध किंवा मागासवर्गीय कुलगुरू नाही त्यामुळे राज्यातील किमान दोन विद्यापीठांमध्ये योग्यताधारक बौद्ध दलित प्राध्यापकाला कुलगुरू पदावर निवड करावी.यासह विद्यार्थी;झोपडीवासी;भटके विमुक्त आदी अनेक समाज घटकांना न्याय देणारे विविध विषयांचे 25 ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या विचारमंथन शिबिरात मंजूर करण्यात आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.
देशभरातील दलित मागासवर्गीय तरुणांनी सहकार क्षेत्रात मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.महागाई च्या वाढत्या प्रमाणात विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.रिपब्लिकन पक्ष देशभरातील १४० कोटी जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन उभारण्याचे काम करून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा जनाधार वाढवावा.ओबीसी आणि इ.बी.सी साठी उत्पन्न मर्यादा ८ लाख असून त्यात वाढ करुन उत्पन्नाची अट १२ लाख पर्यंत करण्यात यावी आदी अनेक ठराव या विचार मंथन शिबिरात रिपब्लिकन पक्षाने केले असून त्याचे निवेदन लवकरच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
यावेळी सीमाताई आठवले; रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे;संयोजक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड;राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम;रिपाइं चे युवक आघाडी राज्य अध्यक्ष पप्पू कागदे;प्रकाश लोंढे;मिलिंद शेळके, मातंग समाज आघाडी राज्य अध्यक्ष अण्णा वायदंडे; तसेच ज्येष्ठ साहित्यिक अच्युत माने;ऋषिकेश कांबळे; पुराण मेश्राम;विजय खरे;ॲड दिलीप काकडे ;प्रा विजय काळेबाग; अमर माने ;विजय साबळे ; प्रा शहाजी कांबळे परशुराम वाडेकर सूर्यकांत वाघमारे डॉ विजय मोरे ॲड अशाताई लांडगे; सिद्धार्थ कासारे सौ शिलाताई अनिल गांगुर्डे ;अभया सोनवणे,दयाळ बहादुर; सुरेश बार्शिंग; विजय वाकचौरे ;श्रीकांत भालेराव;अण्णा रोकडे;आदी मान्यवर उपस्थित होते.



