शैक्षणिक

बीडच्या अनुरागचा ‘नीट’ परीक्षेत देशपातळीवर डंका.. अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात २३वा क्रमांक

 एम्स प्रवेश मिळवणारा ठरणार जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी

बीड: अभ्यासातील सातत्य, अपार मेहनत आणि स्वप्नांवर अढळ विश्वास यांच्या बळावर बीडच्या अनुराग बाबासाहेब मोरे याने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET (नीट) परीक्षेत अफलातून यश संपादन केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात २३वा क्रमांक, तर सामान्य गुणवत्ता यादीत ६०८वा क्रमांक मिळवून अनुरागने संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ हे अनुरागचे मूळ गाव. सध्या तो बीड शहरातील धानोरा रोड, भगवान विद्यालय परिसरात वास्तव्यास आहे. त्याचे वडील बाबासाहेब मोरे हे पोस्ट कार्यालयात विमा अधिकारी म्हणून कार्यरत असून, आई शरयू मोरे या गृहिणी आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या अनुरागने शाळेपासूनच अभ्यासात आपले प्राविण्य सिद्ध केले. सेंट अँन्स स्कूल, बीड येथून इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत २०२३ साली दहावीत ९८.३३% गुण मिळवत शाळेत अव्वल क्रमांक पटकावला. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू विज्ञान महाविद्यालय, लातूर येथे अकरावी व बारावीचे शिक्षण घेत २०२५ साली बारावीत ९२% गुण मिळवले. या यशाची खरी परीक्षा होती नीट-२०२५, ज्यामध्ये अनुरागने ७२० पैकी ६०८ गुण मिळवत भारतातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या AIIMS (एम्स) मध्ये प्रवेश मिळवण्यारा जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिला विद्यार्थी ठरणार आहे. त्याला एम्स दिल्ली किंवा भोपाळ या ठिकाणी प्रवेश घेण्याची इच्छा आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय वर्तुळातून अनुरागचा गौरव होत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनुराग हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्याच्या या प्रवासातून ग्रामीण विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवल्यास, कोणतीही मर्यादा आडवी येऊ शकत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

प्रतिक्रिया: -“मी हे यश माझ्या आई-वडिलांना, शिक्षकांना आणि माझ्या महाविद्यालयाला अर्पण करतो. एम्समध्ये जाणं हे माझं स्वप्न होतं, आणि ते पूर्ण झालं. ग्रामीण भागातून आलो असलो, तरी चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर काहीही शक्य आहे, हे या यशातून सिद्ध झालं.”-अनुराग मोरे

“अनुरागचं यश आमच्यासाठी अभिमानाचं आहे. आम्ही कधीही त्याला तू हेच कर असं सुचवलं नाही, पण त्याचं स्वप्न जे होतं ते त्याने अपार मेहनत घेऊन पूर्ण केलं. आजचं यश हे फक्त त्याच्या चिकाटीचं फळ आहे. मी इतर विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो – मोबाईल, व्यसनं आणि वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा. आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी संधी निर्माण केल्या आहेत, त्याचं सोनं करा. अभ्यासात सातत्य ठेवा, यश हमखास मिळेल.”- बाबासाहेब मोरे, वडील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button