भगवान बुद्ध आणि चार आर्यसत्य

तथागत भगवान बुध्द हे चार आर्यसत्याचे जनक आहेत. या चार आर्यसत्यामुळेच सिध्दार्थाचे सम्यक सम्बुध्द झाले. म्हणजेच शाक्यपुत्र सिध्दार्थाने आर्यसत्यांचा शोध लावून बुध्दत्व प्राप्त केले. पाप आणि अकुशल कर्मे यांपासून जो दूर राहतो त्याला आर्य असे म्हटले आहे. म्हणून तथागत बुध्द हे आर्य आहेत, त्यांनी चार आर्यसत्याचा शोध लावला आहे.
जगात दु:ख आहे,दु:खाला कारण आहे,
दु:खावर मात करता येते,दु:ख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगमार्ग होय.
ज्याची मुळासकट तृष्णा नष्ट झाली आहे, ते भगवान होऊ शकले. जे संसारीक मोहात म्हणजे धन संपत्ती, स्री लोलूपता, अंगावर सुगंधीत उटणे, शरीरावर विविध मौल्यवान आलंकार, हिरेजडित माळा किंवा मुकुट या गोष्टींवर आसक्त आहेत ते भगवान नसून सामान्य लोक आहेत. तसेच कोणी स्तूति केली म्हणून प्रसंन्न होऊन वरदान देणे, कोणी निंदा केली म्हणून क्रोधीत होऊन श्राप देणे किंवा विचारशून्य बनून अनावश्यक हिंसेचा वापर करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. असे पात्र भगवान कसे असू शकतात?
भगवान बुध्द म्हणतात तृष्णेचे मुळ कारण अज्ञानात आहे. अज्ञानामुळेच मनुष्य तृष्णेत डुंबतो व दु:ख ओढवून घेतो. ज्याला चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान आहे, जो तृष्णेपासून मुक्त आहे, तोच भगवान आहे.
भगवान बुध्दाचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दु:खाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे. कारण मानवी दु:खाचा अंत करण्याचा अष्टांगमार्ग ते दाखवितात.
त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते. भगवान बुध्दांनी एखाद्या कुशल वैद्याप्रमाणे चार आर्यसत्याचे मुलभूत विश्लेषण केले आहे. त्यांनी प्रथम रोगाचे निदान करुन त्याचे कारण जाणले आहे. तो रोग कसा निर्माण होतो, हे त्यांनी जाणले आहे. नंतर तो रोग नष्ट करण्याचे निश्चित केले व शेवटी त्यावर उपाय सांगितला. दु:ख हा रोग आहे. तृष्णा हे त्या रोगाचे कारण आहे. या रोगावर उपाय करता येतो. आर्यअष्टांगिक मार्गाने हा रोग कायमचा बरा करता येतो, हे सुत्र भगवान बुध्दांनी मांडले. म्हणूनच त्यांना अप्रतिम वैद्य आणि कुशल शल्यकार असे म्हटले जाते.
आजच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही वर्गाचा असो तो धम्माच्या मार्गाने (अष्टांगमार्गाने) प्रज्ञा, शील व समाधीचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पर्यायांपैकी
पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे.
दुसरी सकृदागामी ,तिसरी अनागामी
चवथी पायरी अर्हंत येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे.
आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्तांचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोष भाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो.
समाज माध्यमातून साभार…. सध्दम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.