३१ तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार

मुंबई – ३१ तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करताना अजितदादा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का? शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जातंय. नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी देताना तिजोरीवर भार पडत नाही का? असा सवाल करत शेट्टींनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
२०२९ सालच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले जाईल
गाडीचा एसी बंद पडला म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता, तुम्ही अत्यावश्यक झाला नसता पण राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार असेही राजू शेट्टी म्हणाले. २०२९ सालच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले जाईल असेही शेट्टी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो ३१ तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवारांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.
राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिलं जातं. यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. मात्र, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.