टॉप न्यूज
हालचिंचोळी ग्रामस्थांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

पाणीटंचाई ग्रामस्थाचीं भटकंती
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : हालचिंचोळी (ता. अक्कलकोट ) येथील पाणीटंचाईच्या निवारणार्थ लघुपाट बंधारे तलावामध्ये पाणी सोडण्यास प्रशासनाने नकार दिल्यामुळे मतदान प्रक्रीयावर बहिष्कार टाकण्याचा
इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावर सरपंच श्रीशैल माशाळे, उपसरपंच विक्रम जमादार, माजी सरपंच मानव घोडके ,बबन बनसोडे आदींनी प्रशासनाला निवेदन दिले असून याची तात्काळ कार्यवाही व्हावी अन्यथा मतदानावर बहिष्कार अटळ आहे,अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.हालचिंचोळी येथील लघुपाठ बंधारे तलावामध्ये संदर्भ नुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या अखत्यारित असलेले कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग यांच्याकडे आम्ही वारंवार पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केलेला आहे असे असताना जाणीव पुर्वक आमच्या गावाकडे दुर्लक्ष करुन पाणी सोडण्यासाठी कार्यकारी अभियंतामार्फत नकार देण्यात येत आहे.आमच्या गावामध्ये पावसाळा संपला असता तरी सदयस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असुन उपलब्ध जलस्त्रोतांच्या आधारे पाण्याची गरज
भागविणे शक्य होत नाही.दैनंदिन जिवन जगण्यासाठी पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी शासनाची उदासिनता लक्षात
घेऊन लोकशाही मार्गाने वारंवार केलेले प्रयत्न विफल गेलेले आहेत.एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती करीत असताना आम्हा ग्रामस्थांची मतदान करण्यासाठी
इच्छा होत नाही.ठरावीक भागासाठी पाणी सोडण्याची शासनाची मानसिकता असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
निवडणुका येतील जातील पण ग्रामस्थांना पाणीच नाही मिळाले तर पुढच्या निवडणुकीला मतदान करण्यासाठी हालचिंचोळी ग्रामस्थांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने पाण्याविना गाव सोडून स्थलांतर व्हावे लागेल याचे भान आम्हा सर्व ग्रामस्थांना असल्याने चालु निवडणुकीमध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत,असे सरपंच माशाळे यांनी म्हटले आहे.लोकशाही प्रक्रीयेत शासन हे मायबाप असतात याची आम्हाला जाणीव आहे.येथील लघुपाठ बंधारे तलावात पाणी सोडल्यास लोकशाही गणराज्यात आम्ही
राहत असल्याचा अभिमान असणार आहे, असे घोडके यांनी सांगितले. यामुळे आमचा लोकशाही मधील शासन प्रक्रीयेवरील विश्वास कमी होत असून त्याचाच एक भाग म्हणूण आम्ही शांततेच्या मार्गाने मतदानावर बहिष्कार टाकीत आहोत, असे उपसरपंच जमादार यांनी सांगितले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष शिवानंद खांडेकर,माजी उपसरपंच गेनसिद्ध जमादार, सुरेश धायगोडे, पुंडलिक धायगोडे, पुंडलिक खांडेकर,आमीन करनाचे, सलीम मियावाले, राजा मुल्ला,जहीरबेग मिर्झा, अकबर मिर्झा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.



