टॉप न्यूज

अक्कलकोट येथे 168 कोटी 79 लाख रुपयाच्या भूमिगत गटार  योजनेस प्रशासकीय मान्यता

अक्कलकोट : ( प्रतिनिधी )  अक्कलकोट येथे 168 कोटी 79 लाख रुपयाच्या भूमिगत गटार प्रकल्प योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून 
महाराष्ट्र  नगरोत्थान महाभियानात  मलनिस्सारण प्रकल्प योजनेस मंजुरी मिळाली आहे. लवकरच या योजनेसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेसाठी मंजुरी मिळून निधी मिळावा म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.मोठ्या सार्वजनिक मलनिस्सारण व्यवस्थेत भूमिगत गटाराच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक घरातून गोळा झालेला सगळा शौच, इतर घाण व सगळे सांडपाणी नलिकांद्वारे गोळा करून मलनिस्सारण प्रकल्पात पाठवले जाते. तेथे त्याच्यावर विविध प्रकारची भौतिक व रासायनिक प्रक्रिया होऊन सगळी घाण गाळून, बाजूला काढून स्वच्छ पाणी तयार केले जाते. त्यामुळे, ते पाणी पिण्याचा व घरगुती वापर सोडून इतर कुठल्याही कामाला वापरले जाऊ शकते, जसे बांधकाम, बागकाम, शेती, गाडी धुणे इत्यादी कामासाठी करता येते.या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
कल्याणशेट्टी यांनी केले प्रयत्न…
महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कामे जलद गतीने सुरू झाली असून अक्कलकोट शहर भुयारी गटार योजनेस शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे अक्कलकोट शहरातील सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेस अधिक मदत होणार आहे.राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता संदर्भाधीन शासन निर्णयाच्या तरतुदीन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत अक्कलकोट नगरपरिषदेचा मलनिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा सुरू होता. त्या अनुषंगाने सदर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत सादर करण्यात आलेल्या अक्कलकोट मलनिस्सारण प्रकल्पास शासन निर्णयातील अटी व तरतुदीच्या व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.
लवकरच काम सुरु होणार ••••
योजनेसाठी 168 कोटी 79 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर योजनेचे कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच काम सुरु होणार आहे.तसेच योजनेचे काम वेळेत पूर्ण करून यासाठी त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करून कामाची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच अक्कलकोट शहर स्वच्छ सुंदर होण्यास मदत होणार आहे.
महाअभियानाची प्रमुख उद्दिष्टे
राज्याच्या शहरी भागात शासनाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार विविध नागरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शहराच्या वर्गानुसार शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा
विकास करणे आणि शहरांच्या सौंदर्यात्मक वैशिष्ट्यांसह सामाजिक पायाभूत सुविधा वाढवणे.अक्कलकोट नगर
परिषद प्रस्तावित केलेल्या भूमिगत गटार यंत्रणेचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अक्कलकोट शहराची भूमिगत गटार योजना ही गेल्या 30 वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली आणि पुढील 30 वर्षांसाठी म्हणजेच 2056 च्या लोकसंख्येसाठी प्रस्तावित केली आहे. सद्यस्थितीत अक्कलकोट शहरात ओपन ड्रेनेज सिस्टीम आहे आणि सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था, उपचार आणि विल्हेवाट नाही. उघड्या नाल्यांमुळे अस्वच्छ वातावरण निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. डास आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे गंभीर प्रकारचे
साथीचे रोग होऊ शकतात. म्हणून वरील परिस्थिती हाताळण्यासाठी भूमिगत गटार योजना हा सर्वोत्तम उपाय असू
शकतो. नागरिकांच्या भविष्यातील मागणीचा विचार करून सांडपाणी व्यवस्थापनाची पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि सीवरेज सिस्टीमच्या क्षेत्रात दर्जेदार सेवा प्रदान करणे हा प्रकल्पाचा उद्देश ठेवण्यात आला आहे.शहरातील सर्व घन पाणी या मलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रक्रिया करून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या नियमानुसार पर्यावरण पूरक प्रक्रिया केलेले पाणी लगतच्या नाल्या मध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच प्रक्रिया केलेले पाणी हे शेती व बाग कामासाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button