सामाजिक

धम्मपद-मल वग्गो

मल वर्ग हे धम्मपदातील अठरावे प्रकरण आहे. या वर्गामध्ये मनाच्या मळाचे अर्थात आश्रवांचे वर्णन केलेले आहे. या वर्गातील गाथांवरून स्पष्ट होते की, मन:शांतीसाठी मनुष्याने मनातील मळांचा नाश करणे अत्यंत आवश्यक आहे. या मळांना दूर कसे करावे यावर सुद्धा या गाथांमध्ये प्रकाश टाकलेला आहे. कारण निर्वाण प्राप्त करण्यासाठी अशी जागरूकता आवश्यक आहे की, जी क्षण प्रतिक्षण वाढत जाणारी आहे. त्यामध्ये जराही आळस नको, प्रमाद नको. बुद्धांनी राग, द्वेष , मोह यांना आश्रव म्हटलेले आहे. हे तीन मळ अनेक मळांचे अर्थात अनेक विकारांचे जन्मस्थान आहे. अनेक आश्रवांचे जन्मस्थान आहेत.व्यक्तीच्या जीवनामध्ये जर मळ दबा धरून बसलेले असतील आणि ते वाढत असतील तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंना त्याची झळ पोहोचत असते. हे मळ/आश्रव वाढून त्याच्या चेतनेलाही ती दूषित करते, अनेक सदगुणांना खुंटीत करते. त्याचा आपल्या स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम दिसू लागतो. असे मळयुक्त कर्म माणसाच्या व्यक्तीत्वालाच हळूहळू खाऊन टाकतात ज्याप्रमाणे लोखंडाला लोखंडाचा गंज संपवतो.सर्व मळांमध्ये “अविद्या” हा सर्वश्रेष्ठ मळ आहे असे बुध्दांनी सांगितलेले आहे. कारण आपली अविद्या म्हणजे आपले अज्ञान हे आपल्याला दिसत नाही आणि ह्या अज्ञानामुळे आपल्यामध्ये असणारे मळ आपल्याला ओळखता येत नाहीत. अविद्या हा मळ आपल्या उन्नतीसाठी फार मोठा अडथळा आहे. आणि जो कोणी या अविद्या मळांला, दोषांना धुवून टाकतो, नष्ट करतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन दिव्यपद प्राप्त करतो. असा मनुष्य ज्याचे सर्व मळ किंवा आश्रव संपून गेले आहेत तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो.अनेक उपासकांना, भिक्षूंना बुद्धांनी वारंवार उपदेश करून शुद्ध परिशुध्द बनण्यासाठी सांगितले आहे._बुद्ध म्हणतात, स्वाध्याय, अभ्यास न केल्यास पाठ केलेले मंत्र सुद्धा विसरले जातात. घराची नीट स्वच्छता ठेवली नाही, साफसफाई केली नाही तर घरभर जाळे पसरले जातात. माणूस आळशी राहिल्यास त्याचं सौंदर्य निघून जातं आणि अजागृत राहिल्यास पहारेदारावर चोर मात करून जातात. अर्थात स्वाध्याय न करणे हा मंत्राचा मळा आहे, झाडलोट न करणे हा घराचा मळा आहे, आळस सौंदर्याचा मळ आहे, अजागृतता पहारेदाराचा मळ आहे. दुराचरण हा स्त्रीचा मळ आहे. कृपणता हा दात्याचा मळ आहे. या सर्व मळात “अविद्या” हा सर्वात वाईट मळ आहे. त्याला त्यागून माणसाला निर्मळ व्हायचे आहे. यासाठी बुद्ध पंचशीलाच्या आचरणावरती भर देतात. बुद्ध म्हणतात, पंचशीलांचे पालन कठीण असले तरी ते केले पाहिजे. त्यामुळे आपण पापांपासून अलिप्त राहतो. जो पंचशीलांचे उल्लंघन करतो तो माणूस आपलीच पाले मुळे खणत असतो. असे असंयमी लोक अशा पापात गुंतलेले असतात आणि अशा लोभाने, अधर्माने माणूस चिरकालपर्यंत दुःखामध्ये पिसला जाऊ शकतो.

भगवान बुद्ध म्हणतात दुसऱ्याचे दोष पाहणे अत्यंत सोपे आहे. मात्र आपले दोष दिसत नाहीत, जाणीवपूर्वक त्यांना लपवले जाते. मात्र अशा लोकांचे विकार, आश्रव वाढत जातात आणि ते आश्रव क्षयापासून फार दूर जातात आणि म्हणून बुद्ध स्वतःला या मळांपासून दूर राहायला सांगतात. तो मार्गही बुध्दांनीच सांगितलेला आहे._बुद्ध म्हणतात की, हा सारा संसार आणि अनित्य आहे. यात काहीही शाश्वत नाही. या वर्गामध्ये एकूण २१ गाथा आहेत. बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ पैकी १४ गाथां “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत.

(मोहन गणपतराव सोनवणे)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button