शिक्षण,संस्कार व नैतिक मूल्याची जोपासना काळाची गरज- पी आय.. विनोद घुगे

करमाळा ( आयुब शेख ) – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद घुगे साहेब यांनी विद्यार्थ्यांनी-विद्यार्थी दशेत शिक्षणाला प्राधान्य द्यावे. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शिक्षणाबरोबरच संस्काराचे बाळकडू अंगी बाळगावे तसेच नैतिक मूल्यांची जोपासना केल्यास विद्यार्थी त्याच्या जीवनात उत्तुंग यश संपादन करू शकतो तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच व्यायाम, योगा,ध्यानसाधना यांनाही प्राधान्य द्यावे.
विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीतही न डगमगता ध्येय निश्चित करावे. ध्येय निश्चित करून,वाटचाल केल्यास वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करता येते. हे स्वानुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की मी एक सामान्य विद्यार्थी होतो पण माझे ध्येय फौजदार बनण्याचे असल्याने मी खडतर परिश्रम घेतले व त्यातून यश संपादन केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिस्त व भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. गावापासून महाविद्यालयापर्यंत प्रवास करताना वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या नियमाचे तंतोतंत पालन करावे. विद्यार्थी दशेत आपल्या हातून कोणताही गैरप्रकार करणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान केले.
तसेच विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजाला काहीतरी दिलं पाहिजे व ते देण्यासाठी स्वतः अगोदर सक्षम बनले पाहिजे व समाज ऋणातून प्रत्येकाने मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्याना केले.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वय प्रा.लक्ष्मण राख यांनी केले तर आभार प्रा. एम.डी. जाधव यांनी मानले.
