टॉप न्यूज
२० ऑगस्टनंतर एकरुख योजनेतुन खरीप हंगामासाठी पाणी सोडले जाणार..!

२० ऑगस्टनंतर एकरुख योजनेतुन खरीप हंगामासाठी पाणी सोडले जाणार..
प्रशासनाकडून कार्यवाही सुरू; कालव्यातील कचरा काढण्याचे काम सुरु
अक्कलकोट ( प्रतिनिधी- )
यंदाच्या हंगामात जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.उजनी धरणातून एकरूख योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणात पाणी कधी येणार याकडे संपूर्ण अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.मात्र २० ऑगस्टनंतर हे पाणी मिळणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत कारंबा पंप हाऊस,हिप्परगा तलाव,बोरामणी पंप हाऊस,दर्गनहळ्ळी पंप हाऊस या सर्व ठिकाणी आवश्यक यंत्रसामुग्रीची तपासणी व चाचणी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.कालव्यात वाढलेले गवत व कचरा काढण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे.वास्तविक उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर एकरूख योजनेच्या माध्यमातून कुरनुर धरणात पाणी सोडण्यात येईल अशी अपेक्षा सर्वसामान्यातून व्यक्त केली जात होती.उजनी धरणातुन एकरुख योजनेच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आरक्षित पाण्यापैकी ७५ टक्के पाणी सोडता येणार आहे.संभाव्य पुरपरिस्थिती व पावसाच्या गणितावर पाणी सोडले जाणार आहे.८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या कुरनूर धरणात शुक्रवारपर्यंत २६ टक्के म्हणजेच २१३.७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.दमदार पावसाअभावी कुरनुर धरणात समाधानकारक पाणीसाठा नसल्याने सर्वांचेच लक्ष एकरुख योजनेतुन मिळणाऱ्या उजनीच्या पाण्याकडे लागले आहे.दरम्यान एकरुख योजनेतुन कुरनुर धरणापर्यंत पाणी सुरळीतपणे जावे यासाठी अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
लवकर पाणी सोडणे गरजेचे-सिध्दाराम म्हेत्रे (माजी मंत्री) -पाऊस लांबल्याने अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिके अडचणीत आली आहेत. ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून जिल्हाधिकारी महोदय यांना उजनीचे ओव्हरक्लो पाणी कुरनुर धरणात सोडण्यासंदर्भात निवेदन दिले होते. हे पाणी आताच्या घडीला मिळणे खूप गरजेचे आहे.सद्यस्थितीत हे पाणी मिळाल्यास खरीप हंगामातील पाणी सोडण्यासाठी अडचणीतील शेतकऱ्यांना मदत होऊ शकते.
येत्या दोन दिवसांत बैठक व निर्णय..
एकरुख उपसा सिंचन योजना व इतर योजनेतुन जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाणी साठविण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होणार आहे.यानंतर पाणी सोडण्याची प्रक्रिया होईल.बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास २० ऑगस्टपुर्वीदेखील एकरुख उपसा सिंचन योजनेतुन कुरनुर धरणात पाणी सोडले जाऊ शकते,अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातुन मिळाली.