अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगामातील पिके ही सर्वत्र शेतशिवारात बहरली असून अवघी सृष्टी ही हिरवीगार दिसत असल्याचे मनमोहक चित्र पहावयास मिळत आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी बांधवातून चिंता व्यक्त केली जात आहे. आता त्यांचे लक्ष हे पावसाकडे लागले आहे.
अक्कलकोट तालुक्यात जून महिन्यात पाऊस आल्याने खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. यामध्ये तूर सोयाबीन उडीद मूग या पिकांची मोठी पेरणी सर्वत्र करण्यात आली. सध्या तूर सोयाबीन मुग उडीद ही पिके डौलाने बहरली असून शेतशिवारात या पिकांचा रुबाब वाढला आहे .खरीप हंगामातील या पिकांमुळे हजारो हेक्टर शेत जमिनीवरील सृष्टीने हिरवी झालर पांघरल्याचे पहावयास मिळत आहे. शेतातील हिरवेगार पिक पाहून सृष्टीचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करत आहे .सध्या तालुक्यात शेत शिवारात कोळपणीस वेग आला आहे. शेतांमध्ये बैल जोडी द्वारे तसेच ट्रॅक्टर द्वारे कोळपणी करून शेतातील गवत तण काढण्याचे काम शेतकरी बांधवांकडून सुरू आहे. पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असून हाता तोंडाशी आलेला घास हा सध्या निसर्गावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. अक्कलकोट तालुक्यात अवघी सृष्टी ही हिरवीगार झाल्याने सर्वत्र अल्हाददायक वातावरण झाल्याचा अनुभव येत आहे.oplus_0