महाराष्ट्र

जर, फडणवीसांकडे ऑडिओ-व्हिडीओ क्लिप आहेत तर, त्यांनी कारवाई करावी; धमक्या कसल्या देत आहेत: प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले

 

भाजपची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ईडी आणि, सीबीआयकडून कारवाई…

नागपूर -भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय व, आयकर विभाग अशा केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड झाले आहे. ज्यांनी भाजपची ऑफर स्विकारली ते पवित्र झाले व, ज्यांनी नाकारली त्यांच्यावर सदर यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करुन जेलमध्ये टाकण्यात आले. आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ व, व्हिडीओ क्लिप आहेत; त्या उघड करेन म्हणत देवेंद्र फडणवीस धमकावत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे क्लिप असतील तर, त्यांनी कारवाई करावी; नुसत्या पोकळ धमक्या कशाला देत आहेत असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांनी विचारला आहे.
नागपूर येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आ.नाना पटोले म्हणाले की, नाईलाजाने मला पक्षबदल करावा लागला असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले. एकनाथ शिंदे व, त्यांचे सहकारी ईडीच्या धाकाने भाजपच्या गळाला लागले आहेत. तोच प्रयोग माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही केला असेल, त्याच गोष्टींचा ते खुलासा करीत आहेत. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे काही ऑडिओ-व्हिडीओ क्लिप असतील तर, त्यांनी कारवाई केली पाहिजे; त्यांना इथे कुणी अडवले आहे? निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त अशी विधाने करून काय उपयोग आहे? राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, राज्यात ड्रग्ज आणून तरूण पिढी बरबाद केली जात आहे, ड्रग्ज माफियांना ससूनमध्ये व जेलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा दिल्या जात आहेत ह्यांवर ते काही बोलत नाहीत. गृहमंत्रीपदाचा उपयोग फक्त विरोधकांना धमकावण्यासाठी करीत आहात का असे आ.नाना पटोले पुढे म्हणाले.आमदारांना निधी देण्यासाठी पैसे काय सरकारी जमिनी विकून आणू का? असे अर्थमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाल्याची चर्चा आहे. महायुती सरकारने राज्य गहाण ठेवले आहे हे आम्ही पूर्वी म्हणत होतो त्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी दुजोराच दिला आहे. ह्या सरकारने राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवलेले आहे. विकासाच्या नावाखाली कर्ज काढले. पण, विकास फक्त सत्ताधारी लोकांचा झाला. समृद्धी महार्गावर अपघात होत आहेत. २० वर्षे ह्या महामार्गाला काहीच होणार नाही असा दावा ते करीत होते. त्यावर आता खड्डे पडले आहेत, भेगा गेल्या आहेत. ५५ हजार कोटी रुपयांच्या ह्या महामार्गातून सत्ताधारी पक्षांतील लोक व, त्यांच्या बगलबच्च्यांचीच समृद्धी झाली आहे असेही आ.नाना पटोले याठिकाणी म्हणाले.

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन ढेपाळले… –
राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नागपूर, भंडारा, गोदिया, कोल्हापूर, पुणे, इत्यादी ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात मुसळधार पाऊस पडत असतानाच खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग अचानक वाढवण्यात आला, त्याची कल्पना नागरिकांना दिली नाही, लोकांच्या घरात पाणी गेले- सोसायट्यांमध्ये पाणी गेले. पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत पोहोचण्यास उशिर झाला. केवळ एकच बोट मदतीसाठी आली होती. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे ढेपाळले आहे. एवढी गंभीर परिस्थिती होत असताना सरकार मात्र सध्या कुंभकर्णी झोपेत होते. पुण्यातील लोकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. तसेच; राज्यात कुठेही संकट ओढवले तर, तिथे यंत्रणा तात्काळ पोहोचल्या पाहिजेत याकडे सरकारने लक्ष द्यावे असेही आ.नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button