दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून, फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर आल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या धोरणाविरोधात देशभर जन आंदोलन उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करताना त्यांनी केंद्र सरकारवर हुकूमशाहीची भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजप लोकशाहीपेक्षा दडपशाहीवर विश्वास ठेवतात, अशी टीकाही त्यांनी केली. संसदेत आवाज उठविण्याबरोबरच रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी सर्व विरोधी पक्षांना केले.
विद्यार्थ्यांवरील लाठीमारामुळे जनतेमध्ये मोठा संताप असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील विविध जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक संघटनांशी चर्चा करून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत जाण्याची भूमिका नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल. कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली जाणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बंद शांततेत पार पाडला जाईल, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.


