मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरू
मुंबई : राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील ८ मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत असताना राज्याच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. जवळपास ८ मंत्र्यांना बदलण्यात येणार असून त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. नार्वेकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचे सभापती केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, राज्यातील पाच मोठ्या प्रकल्पांना जागतिक वित्तसंस्थांकडून निधी हवा आहे. त्यासाठी फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या प्रकल्पासाठी राज्याला ३.५ अब्ज डॉलर्सची गरज आहे.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या सुदृढ व्यवस्थापनाचे अर्थमंत्र्यांनी कौतुक केले आणि आर्थिक व्यवहार विभागाला खालील प्रकल्पांसाठी बहुवर्षीय प्रकल्प म्हणून मंजूर करण्याचे निर्देश दिले.




