बळीराजाची आर्त हाक: ‘आमदार फुटले, खासदार फुटले… पेपर फूटले देवा, आता तरी ढग फुटू दे!’

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )महाराष्ट्र:महाराष्ट्राच्या मातीत सध्या एक विचित्र आणि अत्यंत वेदनादायी चित्र पाहायला मिळत आहे. राजकारणात सत्तेसाठी आमदार फुटत आहेत, खासदार फुटत आहेत, अख्खे पक्ष फुटत आहेत. दुसरीकडे, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत असून तरुण पिढीची स्वप्ने चिरडली जात आहेत. मात्र, या संपूर्ण गोंधळात आणि व्यवस्थेच्या ढिसाळपणात सर्वात मोठा फटका बसतो आहे तो जगाच्या पोशिंद्याला, म्हणजेच आपल्या शेतकऱ्याला.कडकडत्या उन्हाळ्यानंतर आता पावसाळा सुरू होऊनही आभाळ रीतेच आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोरड्या शिवारातून, तडफडणाऱ्या शेतकऱ्याच्या छातीतून आणि त्याच्या कुटुंबाच्या काळज्यातून आता एकच आर्त हाक बाहेर पडत आहे— “देवा, बाकी सगळं फुटलं तरी चालेल, पण या बळीराजाचं हृदय फुटू देऊ नकोस; आता तरी ढग फुटू दे आणि पाऊस पडू दे!”आशेचा खेळ आणि हुलकावणीमृग नक्षत्र संपून गेले तरी अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी आकाश काळं पडतं, ढग जमतात, सोसाट्याचा वारा सुटतो आणि कोरडी माती सुवासाने भरून जाते. शेतकरी डोक्याला हात लावून, डोळ्यांत आशेचे किरण घेऊन आभाळाकडे पाहतो. यावेळेस पाऊस पडेल, पेरलेलं उगवेल आणि लेकरांच्या ताटात सुखाची भाकरी येईल, अशी स्वप्ने तो पाहतो. पण दुर्दैवाने, ढग येतात आणि हुलकावणी देऊन निघून जातात. पाऊस दाराशी येऊनही हुलकावणी देत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.प्रश्नांचे काहूर आणि उरलेले व्रणसध्या ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी कुटुंबासमोर गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत.शेतात कोरडी पेरणी करावी की पावसाची वाट पाहावी?खतासाठी पैसे खर्च करावेत की आधीच थकलेले कर्ज वाचवावे?मुलांची शाळेची फी भरावी की घरात महिनाभराचे धान्य आणावे?या विवंचनेमुळे बळीराजाच्या काळजावर रोज नवे व्रण उमटत आहेत. राजकीय नेते पक्षांतर आणि निवडणुकांच्या गणितात व्यस्त असताना, निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी मात्र पूर्णपणे एकाकी पडला आहे. आता केवळ आणि केवळ वरुणराजाची अवकृपा संपून आभाळ कोसळावं, हीच एक अंतिम आशा महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे.



