आता राज्यातील प्रत्येक गावात बसवली जाणार स्वयंचलित हवामान केंद्र; शेतकऱ्यांना मिळणार मोठी मदत

मुंबई – केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम (WINDS) प्रकल्पांतर्गत, महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात प्रत्येक तालुका स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात आली आहेत. परंतु आता राज्य सरकारने एक सरकारी ठराव जारी करून, अचूक हवामान अंदाजासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एडब्ल्यूएस बसवण्याची घोषणा केली आहे.राज्यातील सर्व गावांना हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना हवामान- आधारित कृषी सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पात राज्यातील महसूल विभाग स्तरावर एक स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शेराज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी, असे या प्रकल्पामागचा उद्देश आहे. या केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते.
महसूल मंडल स्तरावर महावेध प्रकल्पअंतर्गत यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आली आहे, अशा ग्रामपंचायती वगळून अन्य ग्रामपंचायतींमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपिट, ढगफूटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. ‘महावेध’साठी कृषी विभाग नोडल विभाग म्हणून काम करेल.