सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी १० ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण

माढा ( प्रतिनिधी )
सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून मनकर्णा नदी तसेच, चिंचोली व उपळाई (खुर्द) येथील ओढ्यांमध्ये तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढ्याचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी १० ऑगस्ट, २०२६ (सोमवार) पासून माढा येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी भिमा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित नदी व, ओढ्यांमध्ये सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास चिंचोली, सापटणे (भोसे), शिंदेवाडी, जाधववाडी (मा.), महातपूर, दारफळ, उंदरगाव, रोपळे (खुर्द), उपळाई (बुद्रुक), विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, आदी गावांसह माढा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल असे त्यांनी म्हटले आहे.
यासोबतच शिंदेवाडी, वेताळवाडी आणि, माढा परिसरातील विविध तलाव तातडीने भरावेत अशीही मागणी सदर निवेदनातून इथे करण्यात आली आहे.
प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेवून सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून संबंधित नदी व ओढ्यांमध्ये पाणी सोडावे अन्यथा; १० ऑगस्ट, २०२६ पासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणास तालुका प्रशासनच जबाबदार राहील असा गंभीर इशारा आनंदराव कानडे यांनी दिला आहे.



