राजकीय
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे वाढले बळ ! काँग्रेस पक्षाला करावा लागणार संघर्ष !

अक्कलकोट (स्वामीराव गायकवाड )अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बळ वाढले असून काँग्रेस पक्षाला आगामी काळात संघर्ष करावा लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे तगडे आव्हान काँग्रेस पक्ष कसे पेलणार हे पाहणे गरजेचे आहे .
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाविरुद्ध काँग्रेस पक्षात सामना झाला. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी हे ४९ हजार ५७२ मताधिक्याने विजय मिळवून एक रेकॉर्ड केला आहे. भाजपाचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या या अभूतपूर्व विजयामुळे भाजपाची ताकद ही प्रचंड वाढली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे. काँग्रेस पक्षाला दुधनी वगळता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मोजक्याच गावात मताधिक्य मिळाले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मैंदर्गी अक्कलकोट शहर , वागदरी कुंभारी बोरामणी होटगी जेऊर तडवळ पान मंगरूळ करजगी धोत्री लिंबीचिंचोली डोंबर जवळगे हन्नूर चुंगी चपळगाव वळसंग अचेगाव हांजगी कोन्हाळी दहिटणे बोरगाव सुलेरजवळगे गौडगाव शिरवळ आदींसह विविध गावातून मोठे मताधिक्य भाजपा उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपासोबतच काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते. पण मतमोजणी नंतर मात्र जनतेने भाजपाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिवसरात्र प्रचार करून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून प्रचारात आघाडी घेतली होती. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी ही जनसंपर्कावर भर देत भाजपा समोर आव्हान उभे केले होते. प्रारंभी विधानसभा निवडणुकी थोडी अटीतटीची वाटत होती. पण प्रचारातील नियोजन आणि जनसंपर्कावर भर देऊन शेवटी भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा विजय मिळविला. या विजयामुळे आता पुढील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या भाजपासाठी फायद्याच्या ठरणार आहेत असे राजकीय जाणकारातून मत व्यक्त केले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या विजयामुळे साहजिकच भाजपाचे बळ वाढले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाला मानणारा जनाधार हा जैसे थे आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भाजपाशी संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी खचलेल्या कार्यकर्त्यानां धीर देणे गरजेचे असून हे काँग्रेस पक्षासाठी फायद्याचे ठरणार आहे. भाजपाला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाच्या इच्छुकांची संख्या वाढणार आहे.