भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी

गुजरातमधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी इनर टेंपल, लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले. जून १८९१ मध्ये, वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना व्यवसायासाठी बोलावण्यात आले. भारतात दोन अनिश्चित वर्षे राहिल्यानंतर, ते १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाऱ्याच्या दाव्यासाठी गेले. ते २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम केला. १९१५ मध्ये, वयाच्या ४५ व्या वर्षी, ते भारतात परतले आणि लवकरच अन्यायकारक जमीनकर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले.
इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधींनी भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी राहणी स्वीकारली. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. ते एका स्वयंपूर्ण निवासी समुदायात राहू लागले आणि साधे अन्न खाऊ लागले. गांधी हे आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करण्याचे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.
धार्मिक बहुलवादावर आधारित स्वतंत्र भारताच्या गांधींच्या दृष्टिकोनाला १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला मुस्लिम राष्ट्रवादाने आव्हान दिले; ज्याने ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र मातृभूमीची मागणी केली होती. ऑगस्ट १९४७ मध्ये, ब्रिटनने स्वातंत्र्य दिले, परंतु ब्रिटिश भारतीय साम्राज्य हे दोन अधिराज्यांमध्ये विभागले गेले, एक हिंदू-बहुल भारत आणि मुस्लिम-बहुल पाकिस्तान. अनेक विस्थापित हिंदू, मुस्लिम आणि शीख त्यांच्या नवीन भूमीत जात असताना, विशेषतः पंजाब आणि बंगालमध्ये धार्मिक हिंसाचार सुरू झाला. स्वातंत्र्याच्या अधिकृत उत्सवापासून दूर राहून, गांधींनी पीडित भागांना भेट दिली आणि त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काही महिन्यांत त्यांनी धार्मिक हिंसाचार थांबवण्यासाठी अनेक उपोषणे केली. यातील शेवटचे उपोषण हे १२ जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत सुरू केले जेव्हा ते ७८ वर्षांचे होते. यामागे पाकिस्तानला देय असलेली काही रोख संपत्ती भरण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचे अप्रत्यक्ष लक्ष्य देखील होते.भारत सरकारने धार्मिक दंगलखोरांप्रमाणेच माघार घेतली असली तरी, पाकिस्तान आणि भारतीय मुस्लिम, विशेषतः दिल्लीत वेढा घातल्या गेलेल्या, त्यांच्या बचावासाठी गांधीजी आग्रही होते, असा विश्वास भारतातील काही हिंदूंमध्ये पसरला. यापैकी एक नथुराम गोडसे हा पश्चिम भारतातील हिंदू राष्ट्रवादी होते. त्यांनी ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत एका आंतरधर्मीय प्रार्थना सभेत छातीत तीन गोळ्या झाडून महात्मा गांधींची हत्या केली.
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःदेखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून निर्भत्सना केली. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत – पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. गांधींना सामान्यतः अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.