लोकांच्या कळीच्या प्रश्नांवर राज्यात तिसरा मोर्चा उभा करणार समाजवादी गणराज्य पार्टीचे कपिल पाटील यांचा निर्धार

मुंबई / गोरेगाव –
महाआघाडी असो की महायुती या दोघांनाही महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांविषयी देणेघेणे नाही. कोण गद्दार? कोण खुद्दार? कोण मुख्यमंत्री होणार ? एकमेकाला संपवण्याची भाषा, शिवराळ आरोपबाजी, मराठा विरुद्ध ओबीसी भांडणतंटे, लाडके आणि सावत्र यात दोघांनाही रस आहे. सत्ता मिळवणं हेच त्यांचे राजकारण आहे. म्हणून लोकांच्या कळीच्या प्रश्नांवर राज्यात तिसरा मोर्चा उभा करण्याचा निर्धार समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आज केला.
मुंबईत गोरेगावच्या केशव गोरे स्मारक येथे समाजवादी गणराज्य पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची विस्तारीत बैठक पार पडली. त्यावेळी मुंबईसह राज्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरेगावमधील राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. बैठकीनंतर पार्टीच्या गोरेगाव कार्यालयाचे उद्घाटनही उत्साहात झाले.
या बैठकीला पार्टीचे नेते आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर, जेष्ठ नेते विजय लालवाणी, मलविंदरसिंह खुराणा, सच्चिदानंद शेट्टी, डॉ. कैलास गौड, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, महासचिव अतुल देशमुख, प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे, मुंबई अध्यक्ष अमित झा, कामगार नेते रमाकांत बने, रंगा सातवसे, प्रफुल्ल म्हात्रे, पार्टीचे उपाध्यक्ष अरविंद सावला हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुक चिन्ह बॅटरी टॉर्च –
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने समाजवादी गणराज्य पार्टीला बॅटरी टॉर्च हे निवडणुक चिन्ह दिले आहे. कपिल पाटील यांनी बॅटरी टॉर्च लावत त्याची आज घोषणा केली.
बैठकीची सुरवात बांग्लादेश मधील अत्याचार झालेल्या अल्पसंख्यांक नागरिकांना आणि कलकत्ता येथील निर्मम अत्याचार झालेल्या डॉक्टर तरुणीला श्रद्धांजली वाहून झाली.
बैठकीतील ठराव –
बैठकीमध्ये शेतीमालाला हमीभाव मिळावा, जिरायत शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल, बी-बियाणे, खते यांची सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी, कंत्राटीकरण रद्द करावे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा दर्जेदार आणि मोफत सरकारने द्याव्यात, मुंबईची बेस्ट वाचली पाहिजे, कोकण रेल्वेने कोकणात जाण्यासाठी कसारा कर्जत धर्तीवर शटल सुरू करावी, छोट्या उद्योगांना भांडवल, मार्केटिंग, कच्चा माल मिळण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी हे ठराव करण्यात आले.
स्थानिक पदाधिकारी यांच्या नियुक्त्या –
बैठकीत प्रो गोविंदा आणि प्रो कबड्डीत नावाजलेले अजय बारी यांना गोरेगाव अध्यक्षपदी नेमणूक देण्यात आली. सोबत नंदा कांबळे यांना राज्य सचिव, सुदेश सावंत यांना मुंबई सचिव, अनिकेत पडवळ, कमलेश यादव यांना गोरेगाव उपाध्यक्ष तर हितेश भानूशाली आणि चेतन बनसोडे यांना गोरेगाव सचिवपदी नियुक्ती देण्यात आली.