टॉप न्यूज
उजनीतील ओव्हरफ्लो पाणी कुरनुर धरणात सोडा..

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
अक्कलकोट ( प्रतिनिधी- )सध्या पुणे जिल्ह्यात पावसाची समाधानकारक हजेरी असल्याने जिल्ह्याची वरदायिनी ठरलेले उजनी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार आहे. परंतु अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेले कुरनुर धरण मात्र भरले नाही.ही विसंगत परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यात उजनीतील ओव्हरफ्लो होणारे पाणी एकरुख योजनेच्या माध्यमातून तात्काळ कुरनूर धरणात सोडण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करा अशा प्रकारची मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आले.
मागील वर्षी एकरूख योजनेचे यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.म्हणून या योजनेद्वारे पाणी सोडल्यास अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या पाणीप्रश्नी मदत होणार आहे.ही बाब माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सांगितली.कुरनूर धरणावर दुधनी, मैंदर्गी,अक्कलकोट या नगरपालिकांसह ५२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.बहुतांश लोकांची शेती या धरणावर अवलंबून आहे.निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्यापही कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.यामुळे भविष्याची चिंता वाढत चालली आहे.ही चिंता मिटावी यासाठी उजनी धरणातील ओव्हरफ्लो पाणी कुरनुर धरणात सोडण्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी म्हेत्रे यांनी केली.कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत याविषयी बोलणार असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
तर म्हेत्रे यांच्या मागणीवर निश्चितपणे कार्यवाही करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, सिद्धार्थ गायकवाड,मल्लिकार्जुन पाटील,सोमनाथ चिकलंडे,आप्पा हलसगे,बसवराज माळी आदी उपस्थित होते.
