टॉप न्यूज
शासनाच्या योजना झाल्या उदंड ! पण सर्व्हर मात्र थंड !

अक्कलकोट (प्रतिनिधी ) केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना या उदंड झाल्या असून योजनांचा नुसता सुकाळ आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे .शासनाच्या सर्व योजना या ऑनलाइन पद्धतीने भरावयाच्या असून शासनाच्या उदंड योजना या सर्व्हर नसल्याने थंड झाल्या आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेमधून उमटत आहे.
सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या अनेक योजना या ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येत आहेत.अक्कलकोट शहर व तालुक्यात सीएससी सेंटर व महा-ई-सेवा तसेच मोबाईल मधील विविध अँप द्वारे अनेक योजना शासनाकडे पाठविण्यात येत आहेत .सर्वसामान्य नागरिकांना ही सोय चांगली आहे. विविध कार्यालयात न जाता एखादी योजना ही ऑनलाईन पद्धतीने भरल्यास अनेकांचा वेळ वाचत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना या ऑनलाइन पद्धतीनेच भरल्या जात आहेत. राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडके बहीण योजना, शेतीच्या विविध योजना ,शालेय योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना ,शेतकऱ्यांच्या योजना, पिक विमा योजना, पोस्टाच्या योजना अशा अनेक योजना या ऑनलाइन पद्धतीने भरावा लागत आहेत. अक्कलकोट तालुक्यात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-ई-सेवा तसेच सीएससी सेंटरवर गर्दी होत आहे पण सर्वर व्यवस्थित नसल्याने या योजनांपासून अनेकांना वंचित राहण्याची वेळ येणार आहे. सर्वर नसल्याने योजनांची माहिती भरताना व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. योजना झाल्या उदंड आणि सर्वर मात्र थंड अशी म्हण नव्याने निर्माण होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी हे महा-ई-सेवा केंद्र तसेच सीएससी सेंटरवर गर्दी करत आहेत. पण ऑनलाईन अर्ज भरताना सर्वर नसल्याने विलंब होत आहे. यामुळे नागरिकांवर मनस्तापाची वेळ येत आहे. प्रशासनाने सर्वर व्यवस्थित 24 तास जर दिला तर अनेक योजनांचे अर्ज भरताना नागरिकांना कोणतीच अडचण येणार नाही. प्रशासनाने सर्वर सुरळीत करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी अक्कलकोट शहर व तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे.
