लाडकी बहिण योजना नका देऊ आमच्या लेकरांना शाळेत जायला रस्ता द्या

मुळुकवाडी – मसेवाडी शिवरस्त्याची ग्रामस्थांची मागणी
—
बीड ( प्रतिनिधी ):- बीड तालुक्यातील मसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत निर्मळ वस्ती,मांडवे वस्ती, काटकर वस्ती,ढास वस्ती, शेळके वस्ती वरील जवळपास २०० ग्रामस्थांच्या रहदारीच्या मुळुकवाडी – मसेवाडी शिवरस्त्याची दुरावस्था असल्याने पावसाळ्यात मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट,दुधदुभते भाजीपाला,किराणा आदिंसाठी मसेवाडी गावात जावे लागते.पावसाळ्याचे ४ महिने अडचणींचा सामना करावा लागत असुन वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करूनही रस्त्याची सोय होत नसल्याने ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली तर लक्ष्मी निर्मळ या पालकाने आम्हाला शासनाची लाडकी बहिण योजना नाही दिली तरी चालेल पण आमच्या लेकरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
लाडकी बहिण योजना नको ; आमच्या लेकरांना शाळेत जायला रस्ता द्या:- लक्ष्मीबाई निर्मळ
—-
आमच्या लेकरांना पावसाळ्यात २ किलोमीटर चिखलातून विंचु काट्याचं चालत जावं लागतंय, पाय घसरतेत,काटे मोडतेत.आम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ नाही दिला तरी चालेल पण आमच्या लेकरांना शाळेत जायला धड रस्ता द्या.अशी उद्विग्न प्रतिक्रिया लक्ष्मीबाई निर्मळ यांनी व्यक्त केली.
मुलीला साप चावला चिखलातून खांद्यावर १ किलोमीटर न्यावे लागले:- किशोर निर्मळ
—
पावसाळ्यात रस्त्याची फारच अडचण असुन ५ दिवसांपूर्वी माझ्या मुलीला रोशनीला साप चावला.चिखलातुन १ किलोमीटर खांद्यावर उचलून आणुन बीडला दवाखान्यात दाखल करावे लागले.नशिब म्हणून वाचली नाहीतर अवघड झालं असतं. आमची रस्त्याची सोय करणं आवश्यक आहे.
पुतण्याचा अंत्यविधी खराब रस्त्यामुळे शेतात करता आला नाही :- जलसाबाई सोनावणे
—-
माझा पुतण्या सांगली येथे आरोग्य विभागात काम करत होता. गेल्यावर्षी आजाराने त्याच्या निधनानंतर शेतात अंत्यविधी करायचा होता पण चिखलामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार शेतात न करता बीडला नेऊन करावे लागले. ईतकी बेकार परिस्थिती आहे.
मोजणी फी भरून दिड वर्ष झाले अजुन भुमी अभिलेख अधिकारी मोजणीसाठी आलेच नाहीत:- शाकिंदर काटकर
—
मुळुकवाडी – मसेवाडी शिवरस्ता आहे. शेतकऱ्यांमध्ये वादविवाद नको म्हणून दिड वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून २० हजार रुपये मोजणीसाठी भरले.तहसिलदार यांनी उप अधिक्षक भुमी अभिलेख बीड यांना नियमानुसार मोजणी करून हद्दी व खुणा कायम करून कार्यवाही करण्यात यावी आणि अहवाल कार्यालयात दाखल करून अर्जदार यांना परस्पर कळवावे असे आदेश देऊनही मोजणीसाठी कोणी आलेच नाहीत.
लोकसहभागातून रस्ते करण्याची ग्रामस्थांवर वेळ येत असेल तर जाहिरात बाजींवर कोट्यवधीं रुपयांची उधळपट्टी कशासाठी ??:-डॉ.गणेश ढवळे
—
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील मातोश्री पाणंद रस्ते योजना केवळ कागदावरच असुन शासनदरबारी पाठपुरावा करून त्रासलेले ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्ते करण्यास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून रस्ते करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असेल तर शासनाच्या योजनांचा गाजावाजा करत त्यावर जाहिरात बाजींची कोट्यवधीं रूपयांची उधळपट्टी कशासाठी?? असा प्रश्न उपस्थित होतो.