राजकीय

सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या गझनीच्या महमूद प्रमाणेच नरेंद्र मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला: हर्षवर्धन सपकाळ

 

अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे भाजपा व मोंदींकडून घोर पाप, धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या मोदींनी जनतेची जाहीर माफी मागावी.

जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची घडाळ्याबरोबर आघाडी नाही, जेथे शक्य असेल तेथे समविचारी पक्षाशी आघाडी.

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनितीवर सविस्तर चर्चा.

मुंबई -सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. भाजपा व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत म्हणूनच अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध केला व ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींचा ३०० वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाचा हा दुटप्पीपणा जनतेनेसमोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा गंभीर आरोप करून अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजपा व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला आहे.

भाजपाच्या एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही..

ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यावेळी म्हणाले की, अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये वाराणसीत मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर १० जानेवारी रोजी भाजपा सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला. यावेळी अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. २७ तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावर बुलडोझर चालवून धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार गोपीचंद पडळकरसारखे धनगर समाजाचे नेते म्हणवणारे गप्प कसे बसले, असा सवाल प्रा. यशपाल भिंगे यांनी विचारला आहे.

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक..
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली जाईल. जेथे आघाडी करणे शक्य आहे तेथे आघाडी केली जाईल परंतु घड्याळाशी आघाडी केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लातूर व नांदेड महानगरपालिकेत दोन्ही पक्षांनी आघाडी करून योग्य पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेलो. वंचित बरोबरची आघाडी ही आकड्यांचा खेळ नाही तर वैचारांचा मेळ आहे. दोन्ही पक्षामध्ये योग्य समन्वय असून जी टीका केली जात आहे ती एकांगी आहे, असे सपकाळ म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्याबदद्ल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाचा विचार करू नये, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य विजयी पताका फडकवत असताना अमेरिकेच्या दबावाला बळी पडून नरेंदर सरेंडर का झाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे, मुंबई महानगरपालिकेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होत नाही, याचा मोदींना आनंद झाला असावा, असेही सपकाळ म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button