सोलापूर

गंभीर दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव अहवाल शासनास तातडीने सादर करण्यात यावा : आमदार सचिन कल्याणशेट्टी

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई आणि शेतीसमोरील संकटाबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.यंदा अक्कलकोट तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध जलप्रकल्पांमध्येही अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नसल्याने शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी मागणी आमदार कल्याणशेट्टी यांनी केली.
प्रत्यक्ष पाहणी व अहवालातील परिस्थिती लक्षात घेऊन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था तसेच शेतकऱ्यांना आवश्यक मदत याबाबत प्रशासनाने वेळेत निर्णय घेणे गरजेचे आहे. परिस्थिती आणखी गंभीर होण्याची वाट न पाहता नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार कल्याणशेट्टी यांनी यावेळी केली.

कल्याणशेट्टी यांनी केलेल्या प्रमुख मागण्या :

1)जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची तातडीने बैठक घेऊन अक्कलकोट तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात यावा व गंभीर दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव/अहवाल शासनास तातडीने सादर करण्यात यावा.
२. टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्काळ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन व निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
३. जनावरांसाठी चारा छावण्या व चारा डेपो सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
४. बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, आगाऊ मदत/अग्रिम रक्कम व इतर शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात यावेत.
५. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत.
६. उपलब्ध जलसाठ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता आवश्यक पर्यायी उपाययोजना तातडीने हाती घेण्यात याव्यात.याचबरोबर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, पशुपालक व सर्वसामान्य नागरिकांची अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, शासनाने या विषयात तातडीने व संवेदनशीलतेने निर्णय घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही करावी व आवश्यक दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी आग्रही मागणी देखील केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button