माढ्याच्या वेशीपर्यंत आलेले पाणी अचानक थांबवले
प्रशासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल झाल्याचा आरोप
माढा (प्रतिनिधी)
माढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माढा शहराच्या वेशीपर्यंत पाणी पोहोचले असताना पाटबंधारे विभागाकडून मात्र ते थांबविण्यात आल्याने येथील शेतकरी व, नागरिकांमध्ये तीव्र अशा स्वरूपाची नाराजी निर्माण झाली आहे. पाण्यासाठी वारंवार आंदोलने करूनही आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही होत नसल्याने “माढ्याचा पाण्यासाठीचा संघर्ष थांबणार कधी?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी माढ्यापर्यंत पोहोचावे यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद कानडे, शेतकरी व, नागरिकांनी अनेक प्रकारची आंदोलने केली; आंदोलनांनंतर पाटबंधारे विभागाकडून माढ्याच्या मनकर्णा नदीत पाणी सोडण्याची वेळोवेळी आश्वासनेही दिली गेली.
मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात पाणी माढ्यापर्यंत पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे.
आश्वासनांवर शेतकऱ्यांचा आता विश्वास नाही उरला
पाण्यासाठी तीनवेळा आंदोलन करण्याची वेळ येवूनही प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी आणि, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप होत आहे. सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी माढ्यापर्यंत पोहोचणे हा केवळ एका गावाचा प्रश्न नसून परिसरातील अनेक गावांच्या शेती आणि, पिण्याच्या पाण्याशी संबंधित गंभीर असा विषय आहे. त्यामुळे, प्रशासनाने ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
पाणी आले. मात्र, पुन्हा थांबले
दरम्यान, माढ्याच्या वेशीपर्यंत पाणी आले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाकडून अचानक पाणी थांबविण्यात आल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. पाणी सोडले जाणार असल्याच्या आशेने शेतकरी आजही प्रतीक्षेत असताना प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनांवेळीही “पाणी सोडण्यात येईल” अशी आश्वासने दिली गेली होती. मात्र, प्रत्यक्षात पाणी माढ्यापर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे, केवळ आश्वासनांची खैरात न करता पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष कृती करून माढ्याला पाणी द्यावे अशी मागणी याठिकाणी जोर धरत आहे.






