बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट; आजपासून 3 दिवस अतिवृष्टीचा धोका
मुंबई – गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला असून पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी आता पुन्हा एकदा राज्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहील. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण विदर्भ म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि मराठवाड्याच्या काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धरणांमधील पाणीसाठा वाढणार असून नदीपात्रात पुन्हा विसर्ग करावा लागू शकतो ज्यामुळे पूर येण्याचा धोका आहे. 30 सप्टेंबर पासून मात्र पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होऊन दिवसभरात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 5 ऑक्टोबरपूर्वी राज्यातून नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषत: शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचा विचार करून शेतीचे कामे आखणी करण्याचा आणि कापणी केलेल्या पिकांचे पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.



