अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील उडगी ते तोळणूर रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे .सदरच्या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा उडगी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश नारायणकर यांनी दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील उडगी ते तोळणूर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे. सदरच्या रस्त्याचे काम व्हावे यासाठी तोळणूर ,उडगीसह परिसरातील नागरिकांनी मागणी केली होती. या रस्त्याच्या ठेकेदाराने काम केले पण ते अर्धवट केल्याने वाहन चालकातून व नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्याचे काम काही ठिकाणी करण्यात आले पण काही ठिकाणी नुसती खडी टाकण्यात आल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. अर्धवट कामामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता अपघाती रस्ता म्हणून ओळखला जात आहे. उडगी ते तोळनूर हा रस्ता आंतरराज्य मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी वाहनधारकातून व नागरिकांतून केली जात आहे. उडगी ते तोळणूर रस्ता पूर्ण न केल्यास ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा उडगी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश नारायणकर यांनी दिला आहे.