सामाजिक
अक्कलकोट शहरात पाण्यासाठी बोंबाबोंब ! बारा दिवसाआड पाणीपुरवठा !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहराला नगर परिषदे कडून बारा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून पाण्यासाठी नागरिकांतून बोंबाबोंब सुरू आहे. नगरपरिषदेच्या एकूणच कार्यपद्धतीवर अक्कलकोटकरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
अक्कलकोट तीर्थक्षेत्र नगरी कायमच पाण्यासाठी तहानलेलं राहावे लागत आहे. अक्कलकोट शहरासाठी कुरनूर येथील धरणातून पाणीपुरवठा योजनेतून कायमची सोय करण्यात आली. अक्कलकोट शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाने कोट्यावधीची योजना दिली. पण अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा काही सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अक्कलकोट नगर परिषदेकडून सध्या बारा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महिन्यातून केवळ तीन वेळाच नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. ही शरमेची गोष्ट आहे. अक्कलकोट शहरातील नागरिक हे पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. शहरात सर्व जारचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. नागरिकांना पाण्यासारखी मूलभूत गरज नगर परिषदेकडून पूर्ण केली जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट शहरातील समस्येसाठी कोणत्याच राजकीय पक्षाने तसेच सामाजिक संघटनेने आवाज उठवला नाही. केवळ राजकीय हेतूनेच सर्वत्र हितसंबंध जोपासणारे नेते निर्माण झाल्याने सर्वसामान्य अक्कलकोट करातून तीव्र भावना व्यक्त केला जात आहेत. अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने निदान पाणीपुरवठ्याची कार्यशैली बदलून अक्कलकोट शहराला तीन-चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी निदान पाणी तरी वेळेवर द्यावे द्यावे अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
चौकट – अक्कलकोट नगर परिषदेला एक्सप्रेस फ्रिडर मधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण यामध्ये वीज वितरण कंपनीकडून सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय येत आहे.जर विद्युत पुरवठा कायम सुरळीत राहिला तर अक्कलकोट करांना नगरपरिषदेकडून सुरळीत पाणीपुरवठा होईल – मुख्याधिकारी रमाकांत डाके.