सामाजिक

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्यामुळेच समाज उच्चशिक्षित – पोलीस उपायुक्त दिपाली काळे 

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाचा वारसा टिकवून ठेवला पाहिजे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. वाचाल तर वाचाल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षण द्या. त्यांच्या पायावर उभे राहू द्या , लग्न करण्याची घाई करू नका. आम्ही जे पोलीस अधिकारी, डॉक्टर , शिक्षक, पोलीस कर्मचारी झालो हे केवळ भाग्य नाही तर शिक्षणामुळे झालो आहोत. हे शिक्षण देण्याचे काम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे. भावी पिढीला अधिकारी बनायचे असेल मोठे व्हायचे असेल तर अभ्यास करा असे प्रतिपादन सोलापूर पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी येथे विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी साजरी करण्यात आली .यावेळी पंचशील समाजसेवा मंडळ हालचिंचोळी कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर पोलीस उपायुक्त दिपाली काळे बोलत होत्या. या कार्यक्रमास सोलापूर सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन डॉक्टर औदुंबर मस्के ,शाखा अभियंता राजेश जगताप , वळसंग पोलीस ठाण्याचे पीएसआय विद्यासागर सोनकांबळे पत्रकार राजेश जगताप ,पत्रकार स्वामीराव गायकवाड , माजी मुख्याध्यापक विश्रांत गायकवाड बक्षीहिपरगे, विपिन सुरवसे , रणजीत भोसले, ग्रामपंचायत सदस्य शालुबाई बनसोडे ,माजी मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे ,बँक ऑफ इंडिया वळसंग कॅशियर नंदकुमार पुटगे , आंबेडकरी चळवळीतील नेते तुकाराम दुपारगुडे , माजी सरपंच मानव कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी सिद्धाराम बनसोडे , मुस्तीचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गौतम चौधरी , सिद्धार्थ बोराडे , माजी सैनिक दयानंद कांबळे ,बक्षीहिपरगे येथील माजी मुख्याध्यापक सुहास गायकवाड आदींसह उपस्थित मान्यवरांचा सन्मान पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचशील समाजसेवा मंडळ हालचिंचोळी तर्फे मानपत्र , सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . तसेच समाजातील जेष्ठ नागरिक श्रीशैल माशाळे, सदाशिव सोनवणे , धानप्पा गायकवाड , बलभीम जैनजांगडे लक्ष्मण इंगळे आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मंडळाचे प्रमुख कुमार वाघमारे जयंती मंडळाचे अध्यक्ष कैलास बनसोडे , सचिव सुनील सोनवणे महादेव बनसोडे , बब्रुवान बनसोडे ,महादेव गायकवाड , भीमाण्णा काळे आदींसह उपासक , उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम दुपारगुडे यांनी केले तर आभार कुमार वाघमारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button