सामाजिक
अक्कलकोट तालुक्यात आर एस एस चा विजयदशमी उत्सव व पथ संचलन संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) विमर्श प्रस्थापित करुन समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करुन,जाती जातीमध्ये भांडणे लावुन राष्ट्र नेस्तनाबुत करण्यासाठी देशाच्या शत्रूंचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपण सजग राहुन या षडयंत्राला बळी न पडता समाज एकसंघ राहील असे प्रयत्न करावे. समाज संघटीत राहीला तरच राष्ट्र टिकुन राहील असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभागाचे विभाग बौद्धिक प्रमुख निलेश शिरसागर यांनी केले.
अक्कलकोट येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी क्षीरसागर बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ व विजय गणपती ट्रस्टचे प्रमुख अनिल मंगरुळे हे उपस्थित होते. व्यासपीठावर तालुका संघचालक रवींद्र जोशी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना बौद्धिक प्रमुख क्षीरसागर म्हणाले की संघशताब्दी निमित्ताने पंचपरिवर्तनाच्या बिंदुंवर संघ आगामी काळात काम करणार आहे त्यामध्ये समरसता,पर्यावरण,कुटुंब प्रबोधन, नागरिक शिष्टाचार,स्वबोध या विषयांवर संघस्वयंसेवक काम करणार आहेत. प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा परिचय तालुका कार्यवाह चेतन जाधव यांनी केले.
दसऱ्या दिवशी श्रीमंत राजे विजयसिंह चौक(हन्नूर नाका) येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचालनास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून सघोष पथसंंचालनाचा समारोप प्रियदर्शनी मंगल कार्यालय येथे झाला. शहरातील प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करीत व फुलांचा वर्षाव करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे स्वागत केले. पथसंंचालनात गणवेशधारी स्वयंसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. पथसंंचालनात भगवा ध्वज स्वयंसेवक सायबन्ना सोनकांबळे यांनी धरलेला होता. ध्वजाचे रक्षक म्हणून अमोघसिद्ध व्हनमाने,शिवानंद गुंजे,बसवराज माळी,बसवराज साखरे हे होते. अक्कलकोट येथील पथसंंचालनात आ.सचिन कल्याणशेट्टी,महेश हिंडोळे,आनंद तानवडे, मल्लिनाथ स्वामी,मिलन कल्याणशेट्टी,विलास कोरे,मल्लिनाथ मसुती, आदी सामील झालेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक लक्ष्मण सुराजी,विभागाचे प्रसाद हारकुड,जिल्हा प्रचारक प्रतीक भागवत व जिल्हा व्यवस्थाप्रमुख उमाकांत चाफेकर यांनी पथसंंचालनाचे निरीक्षण केले. पथसंचलनाचे सूत्रसंचालन तालुका कार्यवाह चेतन जाधव व तालुका सहकार्यवाह संतोष वगाले यांनी केले.
तसेच तालुक्यातील तडवळ,आळगी,मैंदर्गी या गावातसुद्धा विजयादशमी उत्सव व पथसंंचालन संपन्न झाले. मैंदर्गी येथे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे टीव्हीके प्रांत प्रचारक लक्ष्मण सुराजी हे होते. तडवळ येथे प्रमुख वक्ते जिल्हा बौद्धिक प्रमुख अप्पाशा धनशेट्टी हे तर आळगी येथे प्रमुख वक्ते प्रदीप आकुर्डे हे होते. तालुक्यातील सर्व विजयादशमी उत्सव व पथसंंचलन यशस्वी करण्यासाठी तालुका संघचालक रवींद्र जोशी,तालुका कार्यवाह चेतन जाधव,तालुका सहकार्यवाह संतोष वगाले,तालुका प्रचारात यश कुलकर्णी,आदित्य जोशी,ओंकार पाठक,गुंडू येलमेली,प्रथम आळंद यांनी प्रयत्न केले.
